‘वेळ झाली भर माध्यान्ह
माथ्यावर तळपे ऊन’
तप्त दिशा झाल्या चारी
भाजतसे सृष्टी सारी’
‘वाहतात वारे जळते
पोळतात फुलत्या तनुते’
हा आहे कवितेतला उन्हाळा. अनिलांची कविता नागपूरच्या उन्हात रापलेली आहे. आम्ही जाणूनबुजून उष्णकटिबंधातच जन्मलो. आम्हाला ऊन नाकारून कसे चालेल? उन्हाळा आहे, म्हणून झाडं फुलायची थांबतात थोडीच? पोर्तुगीज भाषेत अशा अर्थाची म्हण आहे की- जे फूल उन्हात उमलतं, ते कधीच कोमेजत नाही. उलट नुकताच वसंत ऋतू येऊन गेला आहे. सगळ्या सृष्टीला नवपालवी, नवबहार आणि नवचैतन्य देऊन गेला आहे. वसंताला चिकटून उन्हाळा येतो, त्याला काही तरी अर्थ असेलच ना? ऊन आहे, म्हणून आम्ही स्वत:ला वातानुकूलित खोलीत कोंडून घेणारे नाही आहोत.
आम्ही शेतकरी आहोत. हे पाहा, सगळं ऊन आनंदाने चाखत लोखंडी नांगराने शेत नांगरून काढायला आणि काश्या वेचायला शेताकडे निघालोत! पाऊस कधीही येवो, अक्षय्यतृतीयेला आपलं रान तयार पाहिजे. गुढी पाडवा हा मुहूर्त असतो, शेतीच्या कामांना प्रारंभ करण्याचा. पश्चिम महाराष्ट्रात म्हण आहे- ‘पाडव्याला पाड, अखि-ताला (म्हणजे अक्षय्यतृतीयेला) राड’.
निर्बंध असलं तरी, आपला देखणा रूपोत्सव साजरा करणारं झाड आहे. त्याला या नावानं संबोधतात. हा असा भारतीय वृक्ष आहे, जो इथून नेऊन बहाव्याचं. अनेकांना त्याचं अमलतास हे नावच आवडतं आणि मराठीतसुद्धा आपल्या उष्णकटिबंधातील देशांत परकियांनी नेऊन लावला. वि. द. घाट्यांनी ‘कॅशिया भरारला’ लिहून तो साहित्यात अजरामर केला, तर आचार्य अत्र्यांनी त्याला केशवाचं झाड म्हटलं, ‘निरंजन वनी केशव फुलला!’ याची फुले पिवळीजर्द व लोंबती असतात, म्हणून त्याचं इंग्रजी नाव ‘गोल्डन शॉवर’ असं आहे. लांब साडेतीन ते पाच सें.मी. व्यासापर्यंत असतात. पाच पाकळ्यांचे हे फूल असते.
देठाकडच्या कळ्या अगोदर उमलतात. त्याच्या पाकळ्या पिवळ्या असून, त्याचा आतून रंग हिरवट-पिवळा असतो. पुंकेसर दहा असून त्यापैकी तीन लांब, चार आखूड व तीन अगदीच लहान असतात. वळदार पुंकेसरांनी झाडाचे सौंदर्य अजूनच वाढते. पावसाळ्यात त्याला रुळाच्या आकार- रंगाच्या शेंगा येतात. अस्वलाला त्या किती आवडतात आणि रेचक असल्याने त्या खूप खाल्ल्याने त्याची कशी बेजारी होते, याची मजेशीर गोष्ट ‘मोहाचे झाड’ नावाने व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिली आहे.
अमलतास मी पाहिल्यांदा पाहिला औरंगाबादच्या मराठवाडा विद्यापीठात. अमलतास इतकाच तेव्हा मला प्रिय होता धनंजय गुडदे. विद्यापीठातून बाहेर पडताना मी दोघांपासून दुरावलो. जिथे नोकरी केली, त्या गावात अमलतास नव्हता. म्हणून दोन रोपं आणली, घरासमोर लावली आणि त्यांना नाव दिले धनंजय गुडदे! अल्पवयातच गुडदे वारला आणि त्याचे प्रेम मी दोन अमलतासांना देऊ लागलो. त्याच्याशी सुख-दुःखाच्या गोष्टी करू लागलो. आता अमलतास माझा हमसफर झाला आहे. असे नाते पुन्हा कोणाशी जडले नाही. धनंजय गुडदे- माझा अमलतास. नंतर गुलजारची कविता आली, अमलतास. पक्षी येऊन रोज अमलतासला बहकवतात, भडकवतात आणि उडण्याच्या, आकाशाच्या, थंड हवेच्या आकर्षक गोष्टी सांगून त्याची दिशाभूल करतात अन् एक दिवस वादळाचा हात पकडून अमलतास उडून जाण्याचा प्रयत्न करतो आणि सडकेच्या मध्यभागी जाऊन पडतो… असा त्या कवितेचा सुंदर आशय आहे.
करंजाचं झाड मी असंच उशिरा नात्यात सामील करून घेऊ शकलो. पस्तीस वर्षे नोकरी केली, त्या कॉलेजच्या ग्रंथालयासमोर ते होते. मी त्याच्या जवळून रोज जात होतो. शेवटी ग्रंथपालाने ओळख करून दिली. करंजीच्या आकाराच्या आणि रंगाच्या कठीण कवचाच्या शेंगा दाखवल्या. त्या फोडल्यानंतर यकृताच्या आकाराच्या बिया दिसतात, हेही त्यांनीच मला सांगितले. करंज! किती सुंदर झाड! त्याची पाने स्पर्शाला किती मुलायम, दिसायला किती चमकदार, पांढरट-गुलाबी रंगाची फुलं किती सुंदर! करंजाचे झाड म्हणे शंभर वर्षे जगते. हत्ती आपली गंडस्थळे त्यावर घासतात, तरीही ते राहते. म्हणजे त्याची जीजिविषा किती ताकदवर. मधमाश्यांना तर ते एवढे आवडते की, त्यांच्याशिवाय करंजाच्या फुलाचे दर्शनही दुर्मिळ! महाकवी कालिदासाच्या रघुवंशात नर्मदाकाठच्या करंजवनांचे उल्लेख आले आहेत.
कुंती हा एक सदाहरित वृक्ष आहे. याची साल साफ, पातळ, पिवळसर रंगाची असते. फांद्या बारीक असतात. पांढऱ्या रंगाची फुले सुगंधित असतात. ब्रह्मदेशात याच्या सालीचा उपयोग सौंदर्यप्रसाधनात होतो. क्षुपरूप आणि वृक्षरूप असे कुंतीचे दोन प्रकार. क्षुपरूप कुंती बागबगीच्यांमध्ये लावली जाते. कारवार वनात आणि श्रीलंकेत मोठमोठे कुंतीवृक्ष आढळतात.
ज्याच्या नावात “फळ’ हा शब्द असला, तरी आपण खाद्य पदार्थांत, मिठायांत, पुरणात, श्रीखंडात वापरतो ते जायफळाचे बी असते. त्याची फळं उन्हाळ्यात लागतात. मे किंवा जूनमध्ये ती पक्व होतात. त्याचे झाड मात्र अतिशय अपरिचित आणि पाहायला दुर्मिळ आहे. जाऊ द्या, आपल्या पुरण आणि श्रीखंडाला ते सजवतं ना!
आईन या महावृक्षाची झाडं मे महिन्यात मोहरू लागतात आणि त्याच्या फुलांचा बहर पावसाळ्यापर्यंत टिकतो. या झाडाचं संस्कृत नाव ककुंभ असे आहे. त्याच्या मंद पण सुंदर सुवासाचं वर्णन ‘मेघदूता’तही येतं. याला ओलसर भूमी लागते. त्यामुळे भारत आणि लंकेतल्या या प्रकारच्या जमिनीतच तो वाढतो. आईन वृक्षाची साल वैशिष्ट्यपूर्ण असते. वरून काळसर व आतून लाल असणाऱ्या सालीला जून झाल्यावर खोल चिरा पडतात. पाने तडतडीत व चिवट असतात. फुले आंब्याच्या फुलांसारखी बारीक असतात, किंचित सुगंधही असतो. हा अर्जुन वृक्षाच्या वंशगटातला आहे. फुलण्याचा ऋतू अर्जुनाप्रमाणेच ग्रीष्म ऋतू हा असतो.
माझ्या गावाकडे शिंदीची खूप झाडं आहेत. माझ्या गावाला चिकटून रामेश्वर नावाचं गाव आहे. आजोबा चेष्टेनं म्हणायचे, लंकेजवळ आहे ते सेतुबंध रामेश्वर आणि वश्याजवळ आहे ते शिंदीबन रामेश्वर. खरोखरच शिंदीची बनंच आहेत तिथं. घाणेरडा जातीयवाद डी.एन.ए.मध्येच असतो की काय! शिंदीच्या झाडातून जे सुंदर पेय मिळतं, ते गावाकडचे सगळे सवर्ण निषिद्ध मानायचे. झाडाला लटकवलेली मडकी (गोवा) पाहतानासुद्धा आम्ही खेड्यातील सवर्णांची मुलं भीतियुक्त नजरेनं पाहायचो. तारुण्य आणि सगळी उमेदीची वर्षे शिंदी न पिताच गेली. साठीनंतर वाचून कळले की, आपल्याकडच्या शिंदीला इकडे नीरा’ म्हणतात. (क्रमशः)
– विश्वावसू काशिकर