बालमित्रांनो, तुम्ही जादूचे प्रयोग बघता तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटते की नाही! असाच एक आश्चर्याचा प्रयोग म्हणजे कागदाचा ग्लास आगीवर ठेवला तरी जळत नाही, असे का होते? असा आश्चर्यकारक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण होईल. याच प्रश्नाची उकल आज समजून घेऊया आणि हा प्रयोग घरी लगेच करून बघा.
स्सस्स… हा…आईच्या तोंडचे हे उदार ऐकताच, “आज कशाचा चटका बसला गं आई?’ असे विचारत प्रणवने हात हातात घेतलावर त्यावर फुंकर घातली. “हा आमटीतील डाव. गरम झाला होता त्याचाच चटका बसला बघ’. “पण आमटी करताना नेहमी तर डावाने हलवत असते की, तेव्हा नाही कधी चटका बसला अन् आजच कसा काय?’
“म्हणजे तुला असा प्रश्न पडला आहे की, नेहमी डाव गरम का होत नाही अन् आज का कसा काय गरम झाला?’ “सांग ना असं कसं ते?’ “अरे एरव्ही बारीक गॅसवर आमटी उकळायला ठेवते, पण आज गॅस मोठा ठेवला होता त्यामुळे. जेवण झालं की एक प्रयोग करू आपण. त्यासाठी तू कागदाचा ग्लास करून ठेव.’
प्रयोग करायचा म्हटल्यावर प्रणवला चांगलाच उत्साह आला होता. जेवण झाल्या झाल्या त्याने आईने सांगितल्याप्रमाणे प्रयोगाला सुरुवात केली. त्या ग्लासमध्ये त्याने पाणी ओतले आणि ग्लास मेणबत्तीच्या ज्योतीवर काळजीपूर्वक धरला. मनात मात्र शंका होती ग्लास कागदाचा आहे, तर हा आता जळणार.
पण गंमतच झाली, ग्लास कागदाचा असूनही तो जळला तर नाहीच उलट ग्लासमधील पाणी मात्र गरम झालं. आता मात्र प्रणव चांगलाच गोंधळला होता. शिवाय पातेल्यातील डाव गरम होण्याचा आणि कागदाच्या ग्लासमधील पाणी गरम होण्याचा संबंध काय, हेही त्याला उमगत नव्हते.
तेवढ्यात आईने प्रणवला विचारले, “काय रे, उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक पदार्थ म्हणजे काय ते आठवते का?’ “हो माहीत आहे ना. उष्णता वाहून नेणारे पदार्थ सुवाहक आणि ज्या पदार्थांमधून उष्णतेचे वहन होत नाही ते उष्णतेचे दुर्वाहक पदार्थ,’ प्रणवने तत्परतेने उत्तर दिले.
“एकदम बरोबर. तर मग आताच्या प्रयोगात वापरलेले पदार्थ, त्याविषयी काय सांगशील?’
“पाणी उष्णतेचा सुवाहक आहेत तर कागद दुर्वाहक. म्हणून ग्लास गरम झाला नाही का?’
“प्रणव जेव्हा तू ग्लासला उष्णता दिलीस तेव्हा ती उष्णता ग्लासमधील पाण्याला पण मिळाली, पाण्याने ती उष्णता शोषून घेतली. पाणी सुवाहक आहे.
त्यामुळे पाण्याच्या तळाकडील थेंबांपासून वरील थेंबापर्यंत उष्णतेचे वहन होत गेले. याचा परिणाम म्हणजे पाणी गरम होत गेले. पण त्याचवेळी कागद दुर्वाहक असल्यानेही उष्णता ग्लासच्या वरच्या टोकापर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे ग्लास गरम झाला नाही. या सगळ्यामुळे ग्लासचे म्हणजेच कागदाचे तापमान ज्वलनांकापर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे ग्लास गरम झाला नाही आणि जळलादेखील नाही.’
“हं समजले. आणि डाव धातूचा असल्याने उष्णतेचे वहन होतो त्यामुळे तो गरम झाला. बरोबर ना पण एक प्रश्न राहतोच बघ आई. डाव नेहमी का गरम होत नाही?’ “एरव्ही जेव्हा गॅस बारीक असतो त्यावेळी हळूहळू मिळणारी उष्णता आमटी उकळायला वापरली जाते.
पण जेव्हा गॅस मोठा ठेवला जातो त्यावेळी पातेल्यातील पदार्थही लवकर त्याच्या उत्कलनांएवढ्या तापमानापर्यंत पोहोचतो.
मग त्या पदार्थाची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता कमी होते. ही जास्तीची उष्णता डावाला मिळते व डावाच्या सर्व कणांपर्यंत उष्णतेचे वहन होते. परिणामी डाव गरम होतो.’ “आई एवढं सगळं माहीत आहे, तरी तू घाई का करतेस?’ प्रणवच्या शब्दांमधून आईविषयी काळजी डोकावत होती.
विशाखा गंधे