सातारा – कारंडवाडी (ता. सातारा) येथे कॅनॉलच्या पुलावर ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन चार महिला पाण्यात पडून बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे या गावात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अरुणा शंकर साळुंखे (वय 58), लीलाबाई शिवाजी साळुंखे (वय 60), सीता निवृत्ती साळुंखे (वय 65), उल्का भरत माने (वय 55) यांचा मृतांमध्ये समावेस आहे. या अपघातामध्ये एक महिला जखमी झाल्याची माहिती असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की या महिला शेतातील काम उरकून ट्रॅक्टरमधून कारंडवाडी गावाच्या दिशेने निघाल्या होत्या. येथून जात असताना जैतापूर गावाच्या हद्दीमध्ये कॅनॉलवरील अरुंद पुलापाशी पावसामुळे रस्ता निसरडा झाला होता. ट्रॉली चिखलामुळे एका बाजूला घसरून यातील चार महिला कॅनॉलमध्ये पडल्या. बचावाची फार संधी न मिळाल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे.
या अपघातामध्ये अन्य एक महिला जखमी झाली, तिला वाचवण्यात यश आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ट्रॅक्टरचालक सुद्धा या अपघातात जखमी झाला आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला. कारंडवाडी व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.