नवी दिल्ली: भारतात शुक्रवारी नव्या 50 कोरोनाबाधितांची नोंद झाली. देशात एकाच दिवशी प्रथमच एवढ्या प्रमाणात त्या विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या 223 इतकी झाली आहे.
भारतातील राज्यांचा विचार करता सर्वांधिक कोरोनाबाधित महाराष्ट्रात आढळले आहेत. त्याखालोखाल केरळमधील 37 जणांना करोनाची लागण झाली आहे. उत्तरप्रदेशात 23 तर दिल्ली, तेलंगण, राजस्थान आणि हरियाणात प्रत्येकी 17 करोनाबाधितांची नोंद झाली आहे. कर्नाटकातील 15 जणांना त्या विषाणूचा संसर्ग झाला आहे. भारतात नोंद झालेल्या करोनाबाधितांमध्ये 32 परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. कोरोनाचा धोका ध्यानात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी विविध पाऊले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी अनेक निर्णय लागू करण्यात आले. त्यामुळे देशाच्या बऱ्याच भागांत अघोषित बंदसारखी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यांचे मुख्यमंत्री स्थितीचा सातत्याने आढावा घेत आहेत.