मुंबई – भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी याला विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठी संघात स्थान दिले नसल्यामुळे आता बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे. महान गोलंदाज व माजी कर्णधार कपिल देव, कृष्णम्माचारी श्रीकांत, महंमद अझरुद्दीन व मदनलाल या माजी खेळाडूंनी बीसीसीआयवर ताशेरे ओढले आहेत. शमीसारख्या गोलंदाजाला वगळून हर्षल पटेलला स्थान कसे दिले गेले, असा सवालही त्यांनी केला आहे.
आशिया करंडक स्पर्धेत अंतिम फेरीही गाठू न शकलेला भारतीय संघच विश्वकरंडक स्पर्धेसाठी कायम कसा ठेवला गेला. तंदुरुस्त झालेल्या जसप्रीत बुमराहसह हर्षल पटेलला संघात स्थान दिले गेले. तीन फिरकी, चार वेगवान, दोन यष्टीरक्षक-फलंदाज, पाच प्रमुख फलंदाज व हार्दिक पंड्या हा एकमेव अष्टपैलू अशी निवड करण्यात आल्याबद्दलही आश्चर्य व्यक्त करण्यात आले आहे.
शमी मॅचविनर – मदनलाल
शमी मॅचविनर गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियात तो भारतीय गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र ठरला असता. त्याची निवड का झाली नाही याचे आश्चर्य वाटत आहे. पहिल्या काही षटकांत तो प्रमुख फलंदाजांना बाद करू शकतो व हे त्याने सातत्याने सिद्ध केले आहे. निवड समितीने संघ निवडताना विचारच केला नाही असे दिसत आहे, असे मदनलाल यांनी म्हटले आहे.
विश्वकरंडक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. तेथील खेळपट्ट्या वेगवान असतात. अशा खेळपट्ट्यांवर शमी अत्यंत भेदक ठरू शकतो. शमीसह श्रेयस अय्यरलाही संघात स्थान द्यायला हवे होते. अय्यरला दीपक हुडाच्या जागी तर पटेलऐवजी शमी अशी निवड होणे गरजेचे होते, असे अझरुद्दीन यांनी सांगितले आहे.
मी जर आत्ता निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर पटेलच्या जागी शमीलाच स्थान दिले असते. नव्या चेंडूवर शमी स्विंग गोलंदाजी करतो तसेच जुन्या चेंडूवर त्याला रिव्हर्स स्विंगही मिळतात, त्यामुळे तो पहिली पसंती असणे महत्त्वाचे होते, असे श्रीकांत यांनी सांगितले.