देशातील विविध राज्यातील स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणाचा विचार करता सर्वात जिवंत आणि घडामोडींनी भरलेले राजकारण म्हणून महाराष्ट्र राज्याचा विचार करावा लागेल. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये या राज्यामध्ये अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेतच; पण आता या राज्याच्या राजकीय व्यासपीठावर नवनवीन खेळाडूंची एन्ट्री होऊ लागली आहे. गेल्या वर्षीच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर फारकत घेऊन भाजपासोबत घरोबा साधला. त्यानंतर राजकारणात एक वेगळी आघाडी तयार झाली. सध्या त्या युतीला भाजप-शिवसेना युती असेच नाव देण्यात येत आहे. या राजकारणातही एक वेगळी युती तयार होत असतानाच आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केएस राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती या पक्षालाही महाराष्ट्रात रुजवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
गेल्यावर्षी जेव्हा राव यांनी आपल्या “तेलंगणा राष्ट्र समिती’ या राजकीय पक्षाचे नाव बदलून “भारत राष्ट्र समिती’ असे नाव केले तेव्हाच त्यांना देशातील इतर राज्यांमध्ये राजकारण करण्यातही रस असल्याचे समोर आले होते. पण इतर कोणत्याही राज्याकडे न वळता त्यांनी आपला मोहरा पहिल्यांदा महाराष्ट्राकडेच वळवला आहे. महाराष्ट्राला लागून असलेल्या आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील नेत्यांचे नेहमीच महाराष्ट्रावर लक्ष असते. ज्या प्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये ओवेसी बंधूंनी आपला एमआयएम हा पक्ष महाराष्ट्रात रुजवला, ते उदाहरण समोरच आहे. महाराष्ट्रातील मतदारांना नेहमीच राजकारणातील नवीन खेळाडूंचे आकर्षण असते की काय, अशी शंका येते. ओवेसी बंधूंनी नांदेड जिल्ह्याच्या माध्यमातूनच आपला शिरकाव सुरू केला होता.
काही वर्षांपूर्वी नांदेड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमचे अनेक नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी राज्याच्या इतर भागातही आपला पक्ष रुजवला आणि काही आमदार व खासदारही निवडून आणले. आज महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये एमआयएम हा पक्ष कार्यरत आहे. आता त्याच धर्तीवर राव यांनी आपला भारत राष्ट्र समिती हा पक्ष महाराष्ट्रात रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राव यांनी महाराष्ट्राचे अनेक दौरे केले. नांदेडमध्ये या पक्षाचा मोठा मेळावाही घेण्यात आला. त्यावेळी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील प्रतिनिधी उपस्थित होते. राव आणि इतर नेत्यांनी स्वतः होऊन प्रत्येक मतदारसंघ निहाय कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम दिला आहे. आपापल्या पातळीवर महिला आणि युवक आघाडी स्थापन कराव्यात आणि भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या सरकारने तेलंगणामध्ये ज्या प्रकारे चांगले काम केले आहे ते मतदारांपर्यंत या प्रतिनिधींनी पोहोचवावे, अशी अपेक्षा राव यांनी व्यक्त केली आहे.
त्यापूर्वीच्या कालावधीमध्ये राव यांनी अनेक माध्यमांमध्ये मोठ मोठ्या जाहिराती देऊनसुद्धा आपण महाराष्ट्रात येत आहोत याचे संकेत दिले होते. तेलगू देसम पक्षातून बाहेर पडून आपला स्वतःचा पक्ष स्थापन करणाऱ्या राव यांच्या पक्षाचे वय फक्त वीस वर्षांच्या आसपास आहे. या वीस वर्षांच्या कालावधीमध्ये स्वतंत्र तेलंगण या विषयाला त्यांनी प्राधान्य दिले होते. स्वतंत्र तेलंगण निर्माण झाल्यावर ज्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या त्यामध्ये राव यांच्या तेलंगण राष्ट्र समितीने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. सध्या त्या राज्यामध्ये कोणताही विरोधी पक्ष फारसा कार्यरत नाही. या संधीचा आणि सत्तेचा वापर करून राव यांनी गेल्या काही वर्षांमध्ये तेलंगणामध्ये अनेक चांगल्या योजना राबवल्या. त्याचा फायदा तेलंगणामधील तळागाळातील जनतेलाही झाला आहे. तेलंगणामधील सत्ता स्थिरस्थावर झाल्यानंतर राव यांनी इतरत्र आपली नजर वळवली नसती तरच नवल. त्यातूनच त्यांनी आपल्या पक्षाचे नामांतर भारत राष्ट्र समिती असे केले.
पक्षाला एक राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा मिळावा हीच त्यांची अपेक्षा आहे आणि या दृष्टिकोनातून त्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे. त्यापूर्वी खरेतर मध्यप्रदेशसारख्या अनेक महत्त्वांच्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत; पण राव यांनी महाराष्ट्रालाच प्राधान्य दिले असून इतर कोणत्याही राज्यातील विधानसभा निवडणूक सध्या आमचा पक्ष लढवणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीतसुद्धा त्यांनी फारसा रस दाखवला नव्हता. महाराष्ट्राच्या भूमीवरूनच त्यांना आपल्या पक्षाची व्याप्ती वाढवायची आहे, हे उघड आहे. राज्यातील विद्यमान राजकारणाचा पट पाहता आगामी कालावधीमध्ये अनेक नाराज नेते आणि त्यांचे गट निर्माण होण्याची शक्यता आहे. या असंतुष्ट नेत्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना एखादा पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम निश्चितपणे राव यांचा भारत राष्ट्र समिती हा पक्ष करू शकतो.
सध्या जे नेते या पक्षाचे काम करत आहेत ते पाहता असंतुष्टांना बरोबर घेऊनच आपला पक्ष वाढवण्याकडे राव यांचा कल असावा, हे उघड दिसत आहे. स्वतःच्या बळावर निवडून येणाऱ्या नेत्यांचा शोध घेण्याचे काम राव यांनी सुरू केले आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील असे काही नेते आहेत जे कोणत्याही राजकीय पक्षात असले तरी स्वतःच्या प्रतिमेद्वारे किंवा स्वतःच्या कामगिरीच्या आधारे ते निवडणुकीत यश मिळवू शकतात, अशाच नेत्यांची मोट बांधण्याचे काम राव करतील, असे संकेत मिळत आहेत. इतर प्रमुख राजकीय पक्षांनी राव यांच्या या शिरकावाकडे दुर्लक्ष केले असले तरी ज्या नियोजनबद्ध पद्धतीने राव यांनी आपला पक्ष वाढवायला सुरुवात केली आहे त्याची दखल कधी ना कधी सर्व राजकीय पक्षांना घ्यावीच लागणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षासोबत आम्ही आघाडी किंवा युती करणार नसून स्वबळावर सर्व 288 जागा लढवणार आहोत, अशी घोषणा राव यांनी केली आहे.
म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या अगदी कमी जरी जागा निवडून आल्या तरी अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये त्यांच्या पक्षाचे महत्त्व वाढू शकते याची जाणीव त्यांना आहे. महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून एकीकडे भाजप-शिवसेना यांची युती आणि दुसरीकडे कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी यांच्यामध्ये राजकीय संघर्ष होत असला तरी आता भारत राष्ट्र समिती असो किंवा अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष असो यासारखे नवनवीन राजकीय खेळाडू महाराष्ट्राच्या राजकीय व्यासपीठावर येत असतील, तर त्याची दखल कधी ना कधी प्रस्थापित राजकीय पक्षांना घ्यावीच लागणार आहे. कारण असे खेळाडू नेहमीच जिंकत नसले तरी प्रस्थापित पक्षांचा खेळ बिघडवू शकतात.