बिहारमध्ये झालेल्या राजकीय उलथापालथीचे कवित्व अजून काही दिवस सुरूच राहणार आहे. यात नितीशकुमारांशी हातमिळवणी करून भाजपला खरंच किती लाभ होणार आहे, हा विषय अधिक महत्त्वाचा आहे. कारण, सारे काही लोकसभा जिंकण्यासाठी सुरू आहे आणि त्यामुळे लोकसभेत या नव्या समीकरणात एनडीएला किती जागा मिळणार यावर याचे गणित अर्थातच अवलंबून असणार आहे. नीट विचार केला तर या नव्या युतीने बिहारमध्ये भाजपच्या पदरात काहीही जादाचे पडण्याची शक्यता नाही, त्याचे कारण असे की बिहारमध्ये लोकसभेच्या ज्या एकूण 40 जागा आहेत त्यातील तब्बल 39 जागा नितीशकुमारांची जेडीयू आणि भाजप यांच्या युतीने 2019च्या निवडणुकीत जिंकल्या आहेत. केवळ एक जागा विरोधकांकडे म्हणजे काँग्रेसकडे गेली आहे.
आता सगळ्याच्या सगळ्या जागा जरी भाजपप्रणित एनडीएने जिंकल्या तरी त्यांना केवळ एकाच जागेचा लाभ होणार आहे. यापेक्षा आकड्यांच्या भाषेत तरी भाजपला याचा फार लाभ नाही. पण एक मात्र नक्की की विरोधकांच्या इंडिया आघाडीचे मानसिक खच्चीकरण करण्याची ही खेळी भाजपला अन्यत्र वातावरण निर्मितीसाठी लाभदायी ठरेल एवढाच त्यातला भाग आहे. भाजपच्या विरोधात विरोधी पक्षांची भक्कम आघाडी व्हावी यासाठी नितीशकुमारांनीच या आधी पुढाकार घेतला होता आणि त्यांनाच भाजपने फोडले ही त्यांची राजकीय खेळी वरकरणी खूप मोठी वाटत असली तरी वर नमूद केल्यानुसार आकड्यांच्या खेळात मात्र एनडीएला काहीही लाभ नाही. उलट प्रशांत किशोर यांच्यासारख्या ज्येष्ठ निवडणूक रणनीतिकारांच्या म्हणण्यानुसार भाजपने नितीशकुमार यांच्याशी जी हातमिळवणी केली आहे त्याचे त्यांना नुकसानच अधिक होण्याचा संभव आहे.
त्याचे कारणही साधे आहे, नितीशकुमार यांनी दहा वर्षांत पाच वेळा पलटूरामाची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या धरसोडीच्या राजकारणाचा बिहारच्या जनतेवर काहीच परिणाम होणार नाही, असे संभवत नाही. त्यामुळे भाजपला या युतीचा फटकाच अधिक बसण्याची शक्यता आहे. पण एक आहे की या युतीमुळे नितीशकुमार यांच्या पक्षाला मात्र व्यक्तिगतरित्या भाजपच्या संगतीचा लाभ होऊ शकतो. या खेरीज या नव्या घडामोडीला फार राजकीय महत्त्व नाही. इंडिया आघाडी भाजपच्या विरोधात तग धरू शकत नाही असे वातावरण निर्माण करणे भाजपसाठी महत्त्वाचे होते. ते त्यांनी या निमित्ताने साधले आहे हे जरी गृहीत धरले तरी नितीशकुमार यांच्याबरोबर सतत धरसोडीची भूमिका घेणे भाजपलाही जड जाण्याची शक्यता आहे. ज्या नितीशकुमारांना आता एनडीएची दारे कायमची बंद करण्यात आली आहेत, अशी राणाभीमदेवी थाटातील भूमिका भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार मांडली होती त्याच नितीशकुमारांना पुन्हा आपले दार उघडे करणे हे जनतेला कितपत रूचेल हा मुद्दाही लक्षात घ्यावा लागेल.
त्यामुळे या नवीन घडामोडींत तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दलालाच बिहारमध्ये पुढे चाल मिळू शकते. काँग्रेस व डाव्यांची साथही त्यांना आहेच. गेल्यावेळी हे सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. सन 2019च्या निवडणुकीतही विरोधकांचे महागठबंधन करण्याची तयारी झाली होती. त्यांच्या नेत्यांच्या एकत्रित सभाही झाल्या होत्या पण प्रत्यक्षात हे बहुतेक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. नितीशकुमारांच्या या राजकारणामुळे बिगर भाजप पक्षांमध्ये मोठी त्वेषाची भावना निर्माण होऊन राजदच्या नेतृत्वाखाली बिहारमधील इंडिया आघाडीला मोठे आव्हान निर्माण करता येणे शक्य आहे. ही सगळी चर्चा करीत असताना भाजपच्या रणनीतिकारांनी नितीशकुमारांनाच इंडिया आघाडीतून फोडण्याची जी खेळी केली ती मात्र अफलातून होती. कोणालाही कानोकान खबर न लागू देता त्यांनी नितीशकुमारांना फोडले आणि एकाच दिवसात त्यांना राजीनामा द्यायला लावून त्यांनाच काही तासात पुन्हा मुख्यमंत्री केले. बहुधा अमित शहा हेच या खेळीचे शिल्पकार असणार या विषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही.
त्यामुळे त्यांच्या राजकीय चाणक्य नीतीची वाहवा यापुढील काही काळ होत राहील. असे सांगतात की गेल्या दोन महिन्यांपासून ही पडद्यामागून सूत्रे हलत होती. म्हणजेच एकीकडे नितीशकुमार विरोधकांच्या बैठकांना सातत्याने हजर राहात होते आणि दुसरीकडे ते भाजपशी जुळवाजुळव करीत होते हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. राजकीय लढाई सुरू झाल्यानंतर महत्त्वाचा राजकीय मोहरा गळाला लावण्याचे भाजपचे कसब दाद देण्याजोगेच आहे. यात नैतिकता किती अनैतिकता किती असले प्रश्न भाजपच्या बाबतीत कधीच विचारायचे नसतात. याचा अनुभव महाराष्ट्राबाबत देशाने घेतला आहे. महाराष्ट्रात 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणार्यांना तुरुंगात पाठवले जाईल अशी घोषणा पंतप्रधानांनी एका जाहीर सभेत केली होती आणि त्याच्या 48 तासांतच त्यांचा रोख ज्यांच्या दिशेने होता, ते सत्तेत जाऊन बसलेले देशाने पाहिले. त्या विषयावरून भाजपवर आणि मोदींवर सातत्याने टीका झाली; पण ती भाजपच्या खिसगणतीतच नव्हती. त्यांना 2024 ची लोकसभा काहीही करून जिंकायचीच आहे. त्यासाठी ते शब्दश: झपाटल्या सारखे कार्यरत आहेत.
नीती-अनीतीची चर्चा बाकीच्या लोकांनी करायची आहे, भाजपला त्यात काडीचाही रस नसतो. राजकारणात असल्या नीती-अनीतीच्या गोष्टी करणारे आज नेभळट किंवा भाबडे ठरू लागले आहेत. बिहारमध्ये या अशा अवाक करणार्या खेळी करून आपल्या पदरात नेमके काय पडणार आहे याचा फारसा विचार भाजपच्या नेत्यांनी केलेला नसावा. त्यांच्यासाठी ही खेळी ‘ना नफा ना तोटा’ अशाच स्वरूपाची ठरणार आहे. पण देशाचे एकूणच राजकारण नासवण्याचा जो प्रकार सुरू आहे त्याची जनतेलाही आता दखल घ्यावीच लागेल. जर जनतेने ही दखल घेतली नाही तर मात्र या राजकीय तमाशाला यापुढील काळात कोणीच लगाम घालू शकणार नाही. त्यामुळे यापुढील खेळी मतदारांनी करायची आहे. पण मतदार इतकी प्रगल्भता आता दाखवू शकतील काय, हाच खरा प्रश्न आहे.