पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शक ठरावावर दीर्घ भाषण केले. त्यात त्यांनी विरोधकांचे विशेषतः काँग्रेसचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न केला. विद्यमान लोेकसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामुळे मोदींचे तिथले हे शेवटचे भाषण होते. त्यामुळे अर्थातच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी भाषण करण्यात फार काही वावगे आहे असे नाही. पण त्यांच्या भाषणातील एक बाब मात्र चांगलीच खटकणारी ठरली, ती म्हणजे मोदींनी याही भाषणात नेहरूंवर टीका केली. यावेळची टीका मात्र इतकी सवंग स्वरूपाची होती की ती कोणत्याही सूज्ञ माणसाला खटकल्याशिवाय राहणार नाही. नेहरूंनी म्हणे भारतीयांना आळशी संबोधून त्यांचा अवमान केला, असे त्यांच्या एका वक्तव्याचा दाखला देऊन मोदींनी म्हटले आहे. त्यावेळी नेहरू प्रत्यक्षात काय म्हणाले होते याचा दाखलाही मोदींनी दिला. नेहरू म्हणाले होते की, ‘भारतातील लोक जादूने श्रीमंत होणार नाहीत, त्यांना खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. युरोपियन, जपानी, चिनी, रशियन आणि अमेरिकी लोक जितके कष्ट करतात तितके आपण करीत नाही.
हे देश जादूने श्रीमंत झालेले नाहीत. मेहनत आणि बुद्धिमत्ता यामुळेच ते सुखी झाले आहेत.’ अशा प्रकारचा नेहरू म्हणाल्याचा दाखला देत मोदींनी त्यांना दूषणे देताना म्हटले आहे की, ‘नेहरू भारतीयांविषयी काय विचार करायचे ते यातून दिसते.’ ते भारतीयांना आळशी म्हणून संबोधित करीत आहेत, असा अन्वयार्थही मोदींनी लावला आहे. भारतीयांची बुद्धिमत्ता कमी असते असा त्यांचा ग्रह होता, अशी टिप्पणीही मोदींनी केली आहे. नीट विचार केला तर नेहरू यांच्या या वक्तव्यात काय चूक होती, सगळ्यांनी देश उभारणीच्या कार्यात जोमाने साथ देऊन अधिक कष्ट करावेत, असे आवाहन एखाद्या पंतप्रधानांनी करण्यातही तुम्हाला जर काही गैर वाटत असेल तर तो तुमच्या दृष्टिकोनातील दोष आहे, असे म्हणावे लागेल. ‘आराम हराम है’ ही नेहरूंची लोकप्रिय घोषणा होती. स्वतः नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्यानंतर अगदी अथक प्रयत्न केले आणि आधुनिक भारताचा पाया रचला हे सारा देश जाणतोे. पण आज इतक्या वर्षांनंतरही काहीही अनुमान काढून नेहरूंवर आगपाखड करणे हा मोदींच्या या दीर्घ भाषणातील एक कच्चा दुवा ठरला आहे.
वास्तविक खुद्द मोदींनीही अशा स्वरूपाची अनेक आवाहने केली आहेत. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मेहनत करून परीक्षेत अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनाचे त्यांच्या शैलीतच अनुमान काढायचे ठरवले, तर मोदींनी भारतीय विद्यार्थी आळशी आहेत आणि ते अभ्यास करीत नाहीत, मेहनत घेण्याची त्यांची तयारी नाही असे नमूद करून मोदींनी भारतीय विद्यार्थ्यांचा अवमान केला असा निष्कर्ष काढणे जितके फाजीलपणाचे ठरेल तितकाच फाजीलपणा मोदींनी नेहरूंबाबत केला आहे, असे म्हणणे चूक ठरणार नाही. मुळात मोदींनी काय किंवा त्यांच्या संघ परिवारातील जुन्या जाणत्यांनी काय कायम नेहरूंचा पाणउतारा करण्यातच धन्यता मानली आहे. या पार्श्वभूमीवर एखादा अभ्यासक नेहरूंनी पंतप्रधान म्हणून नेमके किती काम केले याची माहिती धुंडाळ्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यावर थक्क होण्याची वेळ येते. इतक्या दूरदृष्टीने नेहरूंनी आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. मुळात मुघलांनी सहाशे वर्षे आणि ब्रिटिशांनी दीडशे वर्षे लुटलेला आणि सर्वच बाजूंनी जर्जर झालेला देश नेहरूंच्या हातात आला होता.
पण आपल्या पंतप्रधानपदाच्या राजवटीत नेहरूंनी एकदाही मागच्या राजवटीवर खापर न फोडता वेगाने देश उभारणीचे काम हाती घेतले. स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतापुढे अनेक प्रकारचे प्रश्न आ वासून उभे होते. देशाच्या फाळणीमुळे निर्माण झालेला हिंसाचार आणि तद्अनुषंगिक मोठी आव्हाने देशापुढे होती. संस्थांनांच्या विलीनीकरणाचा प्रश्न होता. मुळात भारताची रचनाच त्यावेळी निश्चित नव्हती ती रचना आधी निश्चित करावी लागणार होती. देशासाठी एक सर्वांना समान सूत्रात बांधणारी घटना तयार करण्याचे आव्हान होते. भारतीय संसदेचीही रचना तयार नव्हती, ही सारी मूलभूत कामे करून लोकांच्या कल्याणासाठीचे कार्यक्रम हाती घ्यावे लागणार होते. रोगराई, निरक्षरता असेही प्रश्न होतेच. सारा देश केवळ शेतीवरच अवलंबून होता. देशात औद्योगिकीकरणाला सुरुवातही व्हायची होती. या सार्या आव्हानांचा सामना करीत नेहरूंनी देशाला वेगाने पुढे नेले ही बाब त्यांचे समकालीन विरोधकही मान्य करीत असत. पण नेहरूंच्या विरोधाची कावीळ झालेल्यांची ही कावीळ आज इतक्या वर्षांनीही बरी झालेली नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.
नेहरूंना दूषणे देताना मोदींनी सन 2014 पूर्वी देशवासीयांना जी आश्वासने दिली होती त्याची किती प्रमाणात पूर्तता केली याचा आढावा त्यांनी या भाषणात घेणे अपेक्षित होते. पण मोदींनी ते काही केले नाही. गेल्या दहा वर्षांत मोदींनी देश खरा किती बदलला याचाही आता नेमकेपणाने धांडोळा घ्यावा लागणार आहे. विदेशात असलेला भारतीयांचा काळा पैसा हा एक मोठा मुद्दा खुद्द मोदींनीच केला होता. मग आज दहा वर्षांत विदेशातील किती काळा पैसा परत आला यावर मोदी बोलले असते तर बरे झाले असते. सन 2022 साली देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार होती. तोपर्यंत आमचे सरकार काय काय उद्दिष्टे साध्य करणार आहे याच्याही मोठ्या वल्गना मोदींनी केल्या होत्या. त्या सगळ्या आश्वासनांचे काय झाले असाही प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होतो.
त्यावरही मोदींचे भाष्य अपेक्षित होते. सन 2022 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होते, ते झाले काय हे मोदींनी सांगणे अपेक्षित होते. आज देशातल्या शेतकर्यांची नेमकी स्थिती काय यावरही ते बोलणे अपेक्षित होते. बाकी महागाई, इंधन दरवाढ, देशावरचे कर्ज, बेरोजगारी हे कळीचे मुद्दे सोडूनच द्या. पण आपण लोकांना दिलेली किती आश्वासने पूर्ण केली हे मोदींनी सांगितले असते, तर लोकांनी त्यांचे कौतुकच केले असते. आपल्या अपयशाचे खापर अजूनही तुम्ही जर नेहरूंवरच फोडणार असाल तर लोक आता ऐकण्याच्या स्थितीत नाहीत एवढे सांगितले तरी त्यातून त्यांना बराच बोध घेता येईल.