संयुक्तराष्ट्रे: संयुक्तराष्ट्राच्या शांतीसेनेत काम करताना जीवाची बाजी लाऊन बलिदान देणाऱ्या पाच भारतीय जवानांचा मृत्यूपश्चात संयुक्तराष्ट्रांकडून सन्मान केला जाणार आहे. संयुक्तराष्ट्रांतर्फे एकूण 83 जणांना लष्करी, पोलीस व सिव्हीलियन पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. त्यात या पाच भारतीय शहिदांचाही मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.
दक्षिण सुदानमधील शांतीसेनेत काम करताना प्राणांचे बलिदान देणारे मेजर रवि इंदर सिंग संधू आणि सार्जंट लाल तारसेम, सार्जंट रमेशसिंग, जॉनसन बेक, आणि एडवर्ड पिंटो, अशी या पाच जणांची नावे आहेत. येत्या 29 मे रोजी होंणाऱ्या कार्यक्रमात त्यांना मरणोत्तर हा सन्मान दिला जाणार आहे.
संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेर्रेस यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण होणार आहे. दर वर्षीच संयुक्तराष्ट्रांच्या शांतीसेनेत काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी हा विशेष दिवस साजरा केला जातो. भारताने शांतीसेनेत काम करण्यासाठी 5400 लष्करी व पोलीस अधिकारी तिकडे पाठवले आहेत आणि ते विविध देशांमध्ये कार्यरत आहेत.