देशातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यासाठी ठीकठिकाणी नागरिक शेकोटी पेटवून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दिल्लीतील एका कुटुंबावर थंडीपासून बचाव करण्यासाठी चूल पेटवणे जीवावर बेतले आहे. दिल्लीतील खेडा परिसरात घडलेल्या या घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे.
खेडा परिसरातील एका कुटुंबाने घरात उब निर्माण व्हावी, यासाठी झोपण्याआधी चूल पेटवून ठेवली होती. चूल सुरु ठेवून हे कुटुंब झोपी गेलं होते. मात्र चूल सुरु असल्याने खोलीत सर्वत्र धूर पसरला. या धुरामुळे कुटुंबातील चार जणांचा गुदमरुन मृत्यू झाला. यात पती-पत्नीसह 2 लहान मुलांचा मृत्यू झाला. मुलांचे वय 7 वर्ष आणि 8 वर्ष इतके होते. थंडीपासून वाचण्यासाठी केलेला उपायच या कुटुंबाच्या जीवावर बेतला. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिल्लीत यापूर्वी देखील अशा प्रकारची घटना घडली आहे. दिल्लीतील हाडे गोठवणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळे उपाय करत आहे. मात्र काही उपाय जीवावर बेतणारे आहेत. हे या घटनेतून पुन्हा एकदा समोर आले आहे. दरम्यान, रात्रभर चूल पेटवून ठेवल्यानंतर निर्माण होणाऱ्या धुरातून कार्बन मोनो-ऑक्साइडसारखा विषारी वायू बाहेर पडतो. त्यामुळे गुदमरुन जीव जाण्याचा धोका निर्माण होत असतो. यामुळे नागरिकांनी खबरदारी घेणे खूप महत्वाचे आहे.