नवी दिल्ली – पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचा नेता सिद्धू मुसेवाला याच्या निघृण हत्येनंतर पंजाब तसेच दिल्ली पोलिस सतर्क झाले आहेत. ऑगस्ट 2021 मध्ये मोहालीत विक्रमजीत उर्फ विक्की मिद्दुखेडाची हत्या झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी मुसेवालाची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. विक्कीच्या हत्येमागे नीरज बवाना आणि टिल्लू ताजपुरिया यांची नावे समोर आली होती. आता नीरज बवानाने इंटरनेट मिडियाद्वारे मुसेवालाच्या हत्येचा बदला दोन दिवसांत घेतला जाईल अशी धमकी दिल्याने पंजाब, दिल्ली, हरियाना आणि राजस्थानातील पोलिस सतर्क झाले आहेत.
कोण आहे नीरज बवाना?
खून, खुनाचे प्रयत्न, खंडणी अशा अनेक प्रकरणांमध्ये नीरज बवाना गेल्या काही वर्षांपासून दिल्लीतील तिहार तरुंगाची हवा खात आहे. लॉरेन्श बिष्णोई आणि नीरज बवाना हे परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी असून सध्या दोघेही तिहार तुरुंगात आहेत. दिल्लीत राहणारा नीरज बवाना हा नामचीन गुंड समजला जातो. त्याच्या टोळीत सुमारे शंभर गुंड आणि काही शार्प शूटर आहेत. नीरज बवाना टोळीची दहशत दिल्लीबरोबरच हरियाना, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये आहे. त्याच्या टोळीतील अनेकजण मूळचे या राज्यांमधील आहेत. नीरजवर खून, लुटमार, खंडणी यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. नीरज बवानाच्या आधी बंबीहा टोळीनेही मुसेवालाच्या हत्येचा बदला घेण्याची घोषणा केली आहे. मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स गँगने घेतल्यानंतर या भागात पुन्हा एकदा टोळीयुद्ध डोके वर काढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्रत्यक्षात सिद्धू मुसेवालाच्या खुनाची जबाबदारी कॅनडात राहून सूत्रे हलवणाऱ्या गोल्डी ब्रार या गुंडाने घेतली आहे. नीरज बवाना टोळीचे अनेक शत्रू होते. सध्या कोणतीही मोठी टोळी त्यांच्या स्पर्धेत नाही. सुरेंद्र मलिक उर्फ नीतू दाबोदा हाच त्यांचा मोठा स्पर्धक होता. मात्र, काही वर्षांपूर्वी नीरज बवाना टोळीने जवळपास सर्व प्रतिस्पर्ध्यांना संपवून टाकले. ऑक्टोबर 2013 मध्ये नीत दाबोदाचा पोलिसांबरोबरील चकमकीत एन्काऊंटर झाला आणि नीरज बवाना टोळीसमोर आव्हान उरले नाही.
दिल्लीजवळील बवाना गावातून आलेल्या नीरजने सुमारे पंधरा वर्षांपूर्वी गुन्हेगारी जगतात पाऊल टाकले. तो स्वतःच्या नावासमोर आडनावाऐवजी गावाचे नाव लावतो. सध्या तो तिहार जेलमधून टोळीचे काम चालवतो तसेच गुन्हेगारी कृत्ये घडवून आणतो. गुन्हेगारी क्षेत्रातील त्याचे जाळे लक्षात घेऊन त्याला दिल्लीतील सध्याचा सगळ्यात मोठा टोळीवाला मानले जाते.
29 मे रोजी रविवारी पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके येथे अज्ञात मारेकऱ्यांनी मुसेवालाचा गोळ्या घालून खून केला. त्याच्या शरीरावर त्यांनी तब्बल 30 गोळ्या झाडल्या. दोन मिनिटात कार्यभाग आटोपून मारेकरी पळून गेले. त्यानंतर मुसेवालाला रुग्णालयात नेण्यात आले पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
मंगळवारी त्याच्या मुसा या गावात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा लाखो लोक जमले होते. उत्तर भारतातील अनेक शहरांमधील गुंडगिरी आणि गुंडांच्या टोळ्यांची सामान्य लोकांना फार कल्पना नसते. अगदी दिल्लीतही गेल्या काही वर्षात गुन्हेगारी टोळ्या परस्परांमध्ये विसर्जित होऊन अधिक मोठ्या आणि खतरनाक बनलेल्या आहेत. मुसेवाला यांची हत्या प्रकरणातही अशाच टोळ्यांचा संबंध असल्याचे पोलिसांचे मत आहे.