लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या चार-पाच दिवसांत झालेल्या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांनी जोर धरला आहे. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या बैलांमार्फत खरीपाच्या पेरणीला सुरुवात केली असून, काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे; परंतु बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे आहे.
मागील तीन महिन्यापासून करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काही बाजार समित्या बंद आहेत, त्यामुळे उत्पादित केलेला माल पाठवायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी शेती पिके घेण्याऐवजी शेती तशीच ठेवली होती, तसेच दुधाला बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. पाऊस झाल्याने खरीप हंगामासाठी शेती मशागतीची कामे सुरू झाली आहे, तर काही गावांनी पेरण्या सुरू झाल्या आहेत.
बाजरी, भुईमूग, कडधान्याची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी घेतलेल्या तरकारीचे पैसे न झाल्याने उत्पादित केलेली तरकारी पिके जनावरांचे खाद्य बनले होते. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या अर्थजनावर झाल्याने बी-बियाणे,खते आणण्यासाठी पैसे नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.