पुणे: लॉकडाऊनमुळे आरटीई अंतर्गत वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव असलेल्या 25 टक्के जागांची प्रवेशप्रक्रिया थांबली होती. आता आरटीई प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरीद्वारे प्रवेश मिळाला आहे, त्यांनी शाळेच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष प्रवेश घ्यावेत, अशा सूचनाही प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे वंचित मुलांना आता प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शैक्षणिक वर्ष सन 2020-21 या वर्षासाठी आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागवून दि. 17 मार्च रोजी लॉटरी काढण्यात आली आहे. त्याद्वारे 1 लाख 920 विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. तसेच 75 हजार 465 विद्यार्थ्यांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मेसेज पाठविण्यात आले. आता लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आलेली आरटीई प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.
कागदपत्राची पडताळणी शाळास्तरावर
यंदाचे शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू झालेले आहे. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळास्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी व संकलन करून पडताळणी समितीच्या मान्यतेतने प्रवेश द्यावेत, असेही आदेश प्राथमिक शिक्षण विभागाने दिले आहेत.
शाळेने करावयाची कार्यवाही
1. गर्दी होणार नाही अशा प्रकारे प्रवेशाचे नियोजन करावे
2. प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर लावावेत
3. पालकांकडून कागदपत्र खरी असल्याची हमीपत्र भरून घ्यावे
4. दिलेल्या तारखेत पालक आले नाही तर पुढची तारीख द्या
5. शाळेने प्रतिक्षा यादीतील पालकांना बोलावू नये
6. करोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना नंतर बोलाविण्यात यावे
पालकांनी करावयाची कार्यवाही
1. शाळेची मेसेज आल्यानंतर तात्पुरता प्रवेश घ्यावा
2. शाळेने दिलेल्या तारखेस येणे शक्य नसल्यास, तसे कळवावे
3. शाळेच्या मेसेजवर अलवंबून न राहता आरटीई पोर्टलवर खात्री करावी
4. चुकीची कागदपत्रे आढळल्यास कारवाई होणार
5. शाळेत प्रवेशासाठी गर्दी करू नये