पुणे – करोना पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश विद्यापीठांमार्फत अंतिम वर्ष अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यांच्या आयोजनात अनेक तांत्रिक त्रुटी समोर आल्या. त्यांच्या चौकशीसाठी राज्य शासनाकडून सात सदस्यीय समिती गठीत केली आहे.
माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक अध्यक्ष असतील, तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव, तंत्रशिक्षणचे संचालक हे सदस्य, संबंधित विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव, संबंधित विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हे निमंत्रित सदस्य आणि उच्च शिक्षण संचालक हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची आढावा बैठक घेण्यात आली. अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला. त्यामध्ये प्रामुख्याने परीक्षा कोणत्या स्वरुपात घेतल्या जात आहेत, परीक्षेसाठी किती विद्यार्थी उपस्थित आहेत, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबत काय उपाययोजना केली, परीक्षेसाठी आलेल्या अडचणी, किती परीक्षा पूर्ण झाल्या व किती परीक्षांचे निकाल जाहीर झाले या सर्व बाबींवर कुलगुरुंनी आढावा सादर करून सविस्तर चर्चा केली. समितीने चौकशी अहवाल शासनास एक महिन्याच्या आत सादर करायचा आहे.