पुणे – राज्यातील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना नियमित राबविण्यात येते. यांतर्गत 485 लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी 2020-21 या वित्तीय वर्षात 3 कोटी 60 लाख रुपये निधी वितरीत होणार असून यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
विद्यार्थ्यांचा अपघात झाल्यास अनुज्ञेय सानुग्रह व यासाठी आवश्यक कागदपत्रे नमूद करण्यात आली असून याबाबतचे प्रस्ताव निकाली काढण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. योजनेसाठी 12 कोटी रुपयांच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद आहे. त्यातील काही अनुदानाचा निधी आता वितरीत होणार आहे. अनुदान ज्या प्रयोजनासाठी मंजूर झाले आहे.
त्याच प्रयोजनासाठी खर्च करावा लागणार आहे. शासनामार्फत वेळोवेळी वित्त विषयक निर्गमित विविध आदेश, नियम, शासन निर्णय वित्तीय नियमावली यांची अंमलबजावणी करून निधी आवश्यकेनुसार मान्य निकषानुसार खर्च करण्यात यावा.
शिक्षण आयुक्त हे नियंत्रक अधिकारी असल्याने त्यांनी सर्व आहरण व संवितरण अधिकारी असलेल्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन परिपत्रकातील अटींची पूर्तता करून तरतूद वितरीत करण्याची दक्षता घ्यावी, असे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी आदेशात नमूद केले आहे.