नवी दिल्ली – दोन आसनी तेजस हे लढाऊ विमान संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट यांच्या उपस्थितीत बंगळुरू येथे आज समारंभपूर्वक हवाई दलाकडे सुपूर्द करण्यात आले. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेकडे होणाऱ्या भारताच्या वाटचालीचे एलसीए तेजस हे प्रतीक आहे, असे अजय भट्ट यांनी यावेळी सांगितले.
तेजस कार्यक्रमाचे महत्त्व त्यांनी विशद केले. देशाने अत्याधुनिक लढाऊ विमाने तयार करण्याचे अत्यंत आवश्यक ज्ञान मिळवले आणि एरोस्पेस परिसंस्था विकसित केली. तेजसच्या विकासामुळे भारतातील संरक्षण आणि एरोस्पेस उद्योगाच्या वाढीला चालना मिळाली आहे. यामुळे असंख्य लहान आणि मध्यम आकाराचे उद्योग, संशोधन संस्था आणि या प्रकल्पाच्या विविध पैलूंमध्ये योगदान देणाऱ्या कुशल कामगारांसाठी संधी निर्माण झाल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
या पहिल्या मालिकेतील ही एचएएलची तेजस विमाने अत्याधुनिक तंत्रज्ञान, चपळता आणि बहु उद्देशी अशा पैलूंनी सज्ज असून हवाई दलाच्या वैमानिकांना उपयुक्त प्रशिक्षण देतील. हवाई दलाने हिंदुस्थान एरॉनॉटिक लिमिटेडकडे आणखी 83 तेजसची ऑर्डर याआधीच दिली आहे.