– आमदार दत्तात्रय भरणे : बोरी येथील नुकसानग्रस्त द्राक्ष, डाळिंब बागेची पाहणी
रेडा- इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शासनस्तरावरून करण्यात यावी, यासाठी आग्रही असणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. द्राक्ष, डाळिंब, ऊस, बाजरी, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोरी गावातील द्राक्ष बागेची पाहणी आमदार भरणे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी, माजी पुणे जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील, इंदापूर पंचायत समितीचे उप गटविकास अधिकारी रमाकांत गुळवे, बोरी गावचे सरपंच संदीप शिंदे, कृषिनिष्ठ शेतकरी राम शिंदे, कळसचे सरपंच गणेश सांगळे, भारत शिंदे, अशोक पाटील, लालासाहेब भिसे, माऊली जोरी, कृषी अधिकारी तसेच कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आमदार भरणे यांनी बोरी गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
भरणे म्हणाले की, बोरी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षबागा व इतर फळबागा दुष्काळी परिस्थिती असताना देखील कर्ज काढून जोपासल्या होत्या. या फळबागा परतीच्या पावसामुळे भुईसपाट झाल्या आहेत. या भागातील शेतकरी खचता कामा नये, याची खबरदारी घेतली जाईल. नुकसानीची माहिती शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनाही दिलेली आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळेल.
यावेळी बोरी, काझड, शिंदेवाडी, कळस, भरणेवाडी येथील शेतकऱ्यांनी आमदार भरणे यांच्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी संपूर्ण व्हावी, अशी मागणी केली. नुकसानीचा अहवाल शासनाच्या वतीने या आठवड्यात दिला जाईल. असे भरणे यांनी सांगितले.