चंदीगड – शेतकऱ्यांनी आपल्या आंदोलनाचे लक्ष्य दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात केंद्रीत करावे. त्यांनी पंजाबात आंदोलने करून येथे अस्थिर स्थिती निर्माण करू नये असे आवाहन पंजाबचे मुख्यमंत्री कॅ अमरिंदरसिंग यांनी केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की शेतकऱ्यांना दिल्लीत जाऊन आंदोलन केले पाहिजे. त्यांचे सारे लक्ष तेथे केंद्रीत होण्याची गरज आहे. पंजाबात आंदोलने केल्याने राज्यातील स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे असेही त्यांनी नमूद केले आहे.
शेतकरी पंजाबातही सध्या आंदोलने करीत आहेत. आजही राज्यातील 113 ठिकाणी त्यांची आंदोलने झाली. त्या आंदोलनाचा राज्यांच्या विकासकामांवरही विपरीत परिणाम होत आहे असे त्यांनी म्हटले आहे.
होशियारपुर येथील एका सरकारी कॉलेजचा पायाभरणी समारंभ आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताची आम्ही नीट काळजी घेत आहोत असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.