लाखणगाव – आंबेगाव आणि शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या हुतात्मा बाबू गेनु सागर (डिंभे धरण) उजव्या कालव्यातून अनधिकृतपणे काही शेतकरी कालव्याच्या वितरिकेचे गेट तोडून पाणी घेत आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाचे नुकसान होत असल्याने अधिकारी आणि कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
अवसरी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पारगाव येथील काही अज्ञात शेतकरी जेसीबी मशीनच्या सहाय्याने कालवा फोडून अनाधिकृतपणे पाणी घेत आहे.त्यामुळे पाणी वाटप नियोजनाचे वेळापत्रक कोलमडले असल्याने संबंधित अधिकारी पोलीस कारवाई करण्याच्या विचारात असून लाभाधारक शेतकऱ्यांच्या त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.
डिंभे उजव्या कालव्याच्या पाण्याचा उपयोग आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील 75 गावांना होतो. हा कालवा कर्डिलेवाडी (ता. शिरूर) पर्यंत जातो. सुरुवातीला पाणी सोडल्यानंतर “हेड’पासून “टेल’पर्यंत असणाऱ्या गावांना शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कालव्याद्वारे दोन दिवस पाणी दिले होते.
सध्या “टेल टू हेड’ पद्धतीने पाणी वाटप सुरू झाले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पाणी मिळाले असतानाही रात्रीच्या वेळी अनाधिकृतपणे जेसीबी आणून काही अज्ञात शेतकरी कालव्यातून निघणाऱ्या वितरिका फोडून पाणी घेत आहेत.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होवून गेट आणि कालव्याचे नुकसान होत आहे. गेट आणि कालव्याच्या वितरिकेला पडलेले भगदाड बुजवण्यासाठी जेसीबी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने जलसंपदा विभागाचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पाणी वाटपाचे नियोजन करणे जलसंपदा विभागाला अवघड होत आहे.
शेतकऱ्यांचा
रात्रीस खेळ चाले
अनधिकृतपणे शेतकऱ्यांनी पाणी घेवू नये. यासाठी जलसंपदा विभागाची अनेक पथके उजव्या कालव्यावर गस्त घालत आहे. गस्ती पथक एखाद्या गावातून पुढे गेल्यानंतर पाठीमागे किंवा रात्री त्या गावातील शेतकरी जेसीबीच्या सहाय्याने कालव्याच्या वितरिका तोडून पाण्याची चोरी करीत आहेत. गस्ती पथकाला पुन्हा सकाळी ज्या ठिकाणी वितरिका फोडली असेल ती बुजवावी लागत आहे.
अनधिकृतपणे कालव्याच्या वितरिका फोडून पाणी घेणाऱ्या अज्ञात शेतकऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यासाठी पत्र दिले जाणार आहे.
– शंकर बांगर, सहायक, स्थापत्य अभियांत्रिकी
ज्या जेसीबी मशीन चालकांनी अनधिकृतपणे वितरिका आणि कालव्याचे नुकसान केले.त्याची माहिती घेण्याचे काम जलसंपदा विभागाचे कर्मचारी करत आहे.सध्या पाण्याचे योग्यप्रकारे नियोजन करण्यात आले असून सर्व शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतीला पाणी दिले जाणार आहे. धरणात पाण्याचा साठा पुरेसा आहे. शेतकऱ्यांनी जलसंपदा विभागाला सहकार्य करावे.
– डी. एस. कोकणे, वरिष्ठ अधिकारी, जलसंपदा विभाग
आंबेगाव-शिरूर भागात डिंभे धरणातून आवर्तन सुरू आहे. मात्र, अनेक शेतकरी कालवा फोडून बेकायदा पाणी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. यावर्षी पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध असून सर्वांना पाणी मिळण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केलेले आहे. चुकीच्या गोष्टी करून या कामात अडथळा न आणता प्रशासनाला सहकार्य करावे.
– दिलीप वळसे पाटील, कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री