नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असली, तरी हे देशातील लहान व मध्यम शेतकऱ्यांसाठी चुकीचा निर्णय आहे, असे मत भारतीय किसान संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे. देशातील बहुतांशी शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही, तर दिल्लीच्या सीमेवर आंदोलनावर बसलेल्या मूठभर शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे भारतीय किसान संघाने म्हटले आहे.
तिन्ही कृषी कायदे देशातील सर्व शेतकऱ्यांना मान्य व्हावे यासाठी त्यामध्ये चार दुरुस्त्या भारतीय किसान संघाने सुचवल्या होत्या. मात्र, केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आता पंतप्रधानांनी पुढील निर्णय घेण्यासाठी ज्या समितीची घोषणा केली आहे त्या समितीत अराजकीय लोकांना म्हणजेच शेतकऱ्यांच्या खऱ्या प्रतिनिधींना तसेच शेतीविषयक अर्थव्यवस्थेच्या जाणकारांना प्रतिनिधित्व द्यावे, अशी अपेक्षाही भारतीय किसान संघाने व्यक्त केली आहे.