मुंबई: प्रसिद्ध लेखिका गिरीजा किर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. बालसाहित्यापासून ते कादंबरीपर्यंत साहित्याच्या विविध प्रांतात लीलया मुशाफिरी करणाऱ्या किर यांचा समावेश मराठीत नामवंत लेखिकांमध्ये होतो. त्या ८६ वर्षांच्या होत्या. त्यांचे मागे दोन मुले आणि सुना असा परिवार आहे.
किर यांच्या किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांनी विविध वाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ११५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे.
१९६८ ते १९७८ या काळात अनुराधा मासिकाची साहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले. हे काम करीत असताना सामाजिक प्रश्नांसंबंधीच्या प्रेमापोटी कामगार वस्ती, कुष्ठरोग्यांची वस्ती आणि आदिवासी भागात जाऊन त्यांनी त्यांच्या जीवनाचा जवळून अभ्यास केला. त्यांनी त्यांचे पुष्कळसे लिखाण या अनुभवांतूनच लिहिले आहे.
येरवड्यातील कैद्यांच्या भावजीवनाचा ६ महिने अभ्यास करून त्यांनी लिहलेले जन्मठेप हे पुस्तक प्रचंड गाजले होते. त्यांचा मानवतावाद दृष्टिकोन आणि विचारातील निर्भीडपणा यासाठी त्या ओळखल्या जात.