मुंबई – महाराष्ट्रातील सुमारे 17 लाख सरकारी आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी 8 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तहसीलमध्ये “फॅमिली मार्च” काढण्याचा निर्णय घेतला आहे.
‘माझे कुटुंब,माझी पेन्शन’चा नारा देत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या कार्यालयात जाऊन या मागणीसाठी निवेदन देणार असल्याची माहिती राज्य कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांच्या समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी दिली. राज्यात 2005 पासून जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली आहे.
आमच्या फॅमिली मार्च नंतरही सरकारकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर आम्ही 14 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाऊ असा इशाराही या संघटनांच्यावतीने देण्यात आला आहे. जुनी पेन्शन योजना बंद झाल्यामुळे आमच्या निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाचा खात्रीशील स्त्रोत बंद झाला आहे असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.