इटावा -उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत जनतेने समाजवादी पक्षाला (सप) पराभूत केले नाही. सत्ताधारी भाजपच्या लबाडीमुळे सपला अपयश आले, असा आरोप ज्येष्ठ नेते शिवपालसिंह यादव यांनी शुक्रवारी केला.
सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे चुलते असणारे शिवपाल येथे पत्रकारांशी बोलत होते. सपच्या जागा आणि मतांमध्ये वाढ झाली. जनता आमच्या पाठिशी आहे. त्यामुळे राजकीय आव्हानांना आम्ही निकराने सामोरे जाऊ. निवडणुकीत लबाडी करतानाच भाजपने लोकशाहीची हत्या केली.
त्यामध्ये भाजपला सरकारी अधिकाऱ्यांचीही साथ लाभली, असा आरोपही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपने उत्तरप्रदेशची सत्ता राखली. मात्र, त्या पक्षाच्या जागा घटल्या. तर, सपच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ झाली.