मुंबई – भाजपावर टीका करताना आज राजू शेट्टी यांनी, ‘भाजपाचं आंदोलन म्हणजे पुतना मावशीचं प्रेम आहे अशी टीका केली होती.’ शेट्टींच्या या टिकेवर आता फडणवीस यांनी देखील जोरदार पलटवार केला असून तिखट शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. ते म्हणतात, ‘राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची लुटूपूटूची लढाई ही सरकार वाचवण्यासाठी आहे’
यावेळी बोलताना फडणवीस यांनी, “राजू शेट्टी हे सरकारी आंदोलक आहेत. त्यांची लुटूपूटूची लढाई ही फक्त सरकार वाचवण्यासाठी आहे. सध्याचा काळ हा अडचणीचा काळ आहे. दूध उत्पादक शेतकरी हा दुधाच्या उत्पन्नावर जगतो आहे. ज्यावेळी दुधाचे दर कमी होतात त्यावेळी दर स्थिर करण्यासाठी सरकार अनुदान देतं. सध्या दुधाला मिळणाऱ्या दरात गायीच्या चाऱ्याचा खर्चही निघत नाही. असं असतानाही सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही हे दुर्दैवी आहे.” अशी टीका केली.
तत्पूर्वी, “भाजपा आणि विरोधीपक्ष केवळ सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे. कारण ठोस उपाययोजना केंद्र सरकारनेच केली पाहिजे. आयात थांबवून निर्यातीला अनुदान द्यायला हवं तसंच जीएसटी मागे घेतला पाहिजे.” अशी टीका राजू शेट्टी यांनी केली होती.