नवी दिल्ली -केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या हकालपट्टीची मागणी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा केली. तसेच, आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मोदी सरकारवर केला.
उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी 14 आरोपींविरोधात तब्बल 5 हजार पानी आरोपपत्र दाखल केले. त्या आरोपींमध्ये मिश्रापुत्र आशिषचाही समावेश आहे. त्या घडामोडीवरून राहुल यांनी मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी करतानाच मोदी सरकारला ट्विटरवरून लक्ष्य केले.
संपूर्ण देशाने आरोपपत्राचे सत्य व्हिडीओच्या रूपाने पाहिले आहे. संपूर्ण देश साक्षीदार आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही प्रतिक्रिया देताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. खोटी माफी आणि कृषी कायदे मागे घेण्यासारखी निवडणूक पाऊलेही मोदींची शेतकरीविरोधी मानसिकता लपवू शकत नाहीत. ते रक्षकाचे पद सांभाळत आहेत. मात्र, भक्षकाला साथ देत आहेत.
शेतकऱ्यांना चिरडण्याच्या प्रकरणात मिश्रापुत्र मुख्य आरोपी आहे. मात्र, मोदींच्या संरक्षणामुळे मिश्रा साधे चौकशीच्या घेऱ्यातही आले नाहीत. तसेच, ते मंत्रिपदावर कायम आहेत, असे ट्विट प्रियंका यांनी केले.