पिंपरी -केंद्र सरकार शेतकऱ्यांचे हित पाहून दरवर्षी एफआरपी वाढवते, ही चांगली बाब आहे. मात्र, सरकारने दोन वर्षे झाले एमएसपी वाढविली नाही. साखरेचे दर वाढत नाही. एफआरपीबरोबरच सरकारने एमएसपीही वाढविणे गरजेचे आहे. तसेच साखरेचे जीवनाश्यक वस्तूमध्ये समावेश असल्याने दर कमीच राहतात. त्यामुळे साखरेला जीवनाश्यक वस्तूमधून वगळावे, अशी मागणी श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब विनोदे यांनी केली.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये गणरायाच्या आरतीसाठी बाळासाहेब विनोदे, दिलीप दगडे आले होते. त्यावेळी विनोदे, दगडे यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. केंद्र सरकारने साखर निर्यातीबद्दल धोरण ठरविणे गरजेचे असल्याचे सांगत विनोदे पुढे म्हणाले, श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखाना प्रगतीपथावर आहे. राज्यातील पहिल्या पाच उत्कृष्ट कारखान्यांमध्ये आमचा कारखाना असल्याचे ते म्हणाले. तसेच ग्राहक मिठाई खरेदी करताना दर पाहत नाहीत. मात्र, साखरेचे दर वाढले की ओरड करतात. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा नागरिकांनी सहानभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंतीही विनोदे यांनी केली.
इथेनॉल प्रकल्प लवकरच सुरू होणार – दिलीप दगडे
संत तुकाराम साखर कारखाना सातत्याने ऊस शेतकऱ्यांचे हित जोपासत असून, त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल, यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत संचालक दिलीप दगडे म्हणाले, कारखान्यांच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अल्प दरात खते पुरविते, त्यांना ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंत बांधावर जाऊन अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जाते. केवळ साखर उत्पादन न करता कारखान्याच्या वतीने वीज निर्मिती केली जाते. तसेच इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्याचे कामकाज सुरू असून येत्या काही महिन्यात हा प्रकल्प कार्यान्वित होईल, असा विश्वासही दगडे यांनी व्यक्त केला. करोनाच्या पहिल्या लाटेत साखर कारखान्याला मनुष्यबळाचा तुटवडा जाणवल्याने कारखान्याला काही प्रमाणात फटका बसल्याचेही दगडे म्हणाले.