नवी दिल्ली- अग्निपथ योजनेबाबत सरकारकडून माहिती दिली जाते आहे. योजना कशी फायद्याची आहे, ते सांगितले जाते आहे. मात्र तरीही काही तरूण उग्र आणि हिंसक निदर्शने करून आपले भविष्य अंधारात लोटत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता लष्कराच्या माजी सैनिकांनी मोर्चा सांभाळला असून तुम्हाला जर अग्निवीर व्हायचे असेल तर या रस्त्यावर जाऊ नका अशी समजावणीची मोहीम या सैनिकांनी सुरू केली आहे.
उत्तर प्रदेशातील गावांगावांत जाऊन मुलांना, त्यांच्या कुटुंबीयांना इतकेच काय तर भरतीच्या तयारी करून घेतल्या जाणाऱ्या कोचिंग सेंटर्सवर जाऊनही या युवकांना अग्निपथ नेमकी काय आहे व त्याचे लाभ काय आणि कसे होतील याची माहिती दिली जाते आहे. आग्रा येथे तर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा सैनिक कल्याण मंडळानेच या कामी पुढाकार घेतला आहे.
योजनेची तपशीलवार माहिती देतानाच चुकुनही दगडफेक, जाळपोळ आणि हिंसाचार करू नका असेही समजावले जाते आहे. तसे केले तर लष्करच काय अन्य कोठेही नौकरी मिळण्यात काय आणि कशा अडचणी येऊ शकतात याचीही माहिती तरूणांना दिली जाते आहे.