लखीमपुर खेरी – उत्तरप्रदेशात लखीमपुरला मंत्रीपुत्राने चार शेतकऱ्यांना आपल्या कारखाली चिरडून ठार मारल्यानंतर तेथे हिंसक झालेल्या जमावाने त्या गाड्यांमधील भाजप कार्यकर्ते व चालकांनाही ठार मारले होते. पण त्या कार्यकर्त्यांनाहीं भाजपने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला जात होता.
भाजपचा एकही नेता किंवा मंत्री त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेला नव्हता. पण आज अखेर उत्तरप्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक हे यात ठार झालेल्या एका भाजप कार्यकर्त्याच्या व चालकाच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी गेले होते. शुभम मिश्रा असे या भाजप कार्यकर्त्याचे नाव असून तो शिवपुरी भागात राहतो.
चालकाचे नाव हरिओम मिश्रा असे असून तो परशेराखुर्द गावचा रहिवासी आहे. मंत्री महोदय आज त्या दोन्ही ठिकाणी गेले आणि त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. 3 ऑक्टोबर रोजी लखीमपुरला झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जण ठार झाले आहेत. मंत्र्यांनी यावेळी पत्रकारांना भेटण्यास नकार दिला.