सांगली :- कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे,असे प्रतिपादन कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगण मैदानावर महानिर्धार २०२४ शेतकरी संवाद व कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात नाना पटोले बोलत होते. तसेच या मेळाव्यात कर्नाटकमध्ये ऐतिहासिक विजय मिळवणारे काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना पुढे नाना पटोले म्हणाले की, भाजपा आपल्या देवीदेवतांचाव वापर फक्त निवडणुकीत मते मागण्यासाठी करत असतो आणि निवडणुका होताच याच देवांचा अपमान करतो. कर्नाटकात भाजपाला भगवान श्रीराम व बजरंगबली यांनीच जागा दाखवून दिली.
आता आदिपुरुष चित्रपटात भगवान श्रीराम व हनुमानाचा अपमान केला आहे. पंढपूरात जागोजागी पोस्टर लावले आहेत त्यातही पांडुरगांचा अपमान केला आहे. हे सरकार आपल्या दैवतांचा अपमान करत आहे, जनतेचा अपमान करत आहे.पांडुरंगाचा अपमान करणारे बोर्ड तातडीने काढून टाका, असं आवाहन देेेेखील त्यांनी यावेळी केले.
छत्तिसगड, राजस्थान, हिमाचल प्रदेश व कर्नाटकमध्ये काँग्रेस विचारांचे सरकार आहे. या राज्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जात आहे, नोकरीचे प्रश्न सोडवले जात आहेत. भाजपाच्या राज्यात मात्र नोकऱ्या संपवण्यात आला, आरक्षण संपवले. धनगर समाजाला २०१९ मध्ये आरक्षण देणार होते पण अजून दिलेले नाही. कर्नाटकात जसा भाजपाचा पराभव करुन काँग्रेसची सत्ता आली त्यापेक्षा मोठा विजय मिळवत महाराष्ट्रातही काँग्रेसची सत्ता आणण्याचा आमचा संकल्प आहे, असं देखील नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसने मोठा विजय मिळवला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा झाली त्याचाही परिणाम कर्नाटकाच्या विजयात दिसून येतो. महाराष्ट्रात असलेले भाजपाचे सरकार काहीही काम करत नाही फक्त घोषणाबाजी, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजीतून खोटेनाटे दावे केले जात आहे. या खोटारड्या शिंदे-फडणवीस सरकारला आगामी निवडणुकीत धडा शिकवू. जत भागातील पाणी प्रश्नावर कर्नाटक सरकार मदत करणार असल्याचे आश्वासन दिले त्याबद्दल आभारी आहोत पण सीमाभागातील लोकांच्या मनात अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
सांगलीतील मेळाव्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, कार्याध्यक्ष बस्वराज पाटील, आ, प्रणिती शिंदे, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, माजी आमदार मोहनदादा कदम, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जयश्री पाटील, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. विक्रम सावंत, सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह पाटील यांच्यासह राज्यातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते देखील उपस्थित होते.