मंचर- करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूला सोमवारी (दि. 23) पहाटेपर्यंत कळंब (ता. आंबेगाव) येथे चांगला प्रतिसाद मिळाला, तसेच पुणे-मुंबई, पिंपरी-चिंचवड किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांशी गावातील व्यक्तींनी संपर्क न ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
कळंब (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत चौकात फ्लेक्सद्वारे, तसेच चारचाकी गाडीवर ध्वनिक्षेपणद्वारे जनता कर्फ्युबाबत माहिती देण्यात आली होती. कळंब, एकलहरे, चांडोली, लौकी, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी इत्यादी गावांमध्ये दवाखाने आणि मेडिकल सेवा सोडून सर्व आर्थिक व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
कळंब गाव आणि परिसरात कोणीही फिरकू नये, यासाठी माजी सभापती वसंतराव भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, सुनील भालेराव, ज्ञानेश्वर पडवळ, मयूर भालेराव, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील श्रीशेटे, अरुण कानडे, युवराज भालेराव, गणेश साळवे, योगेश मोरे, यश भालेराव यांनी प्रबोधन केले. गावात आलेल्या पुणे-मुंबई, पिंपरी-चिंचवड किंवा परदेशातून आलेल्या नागरिकांशी गावातील व्यक्तींनी संपर्क न ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.