पुणे -जिल्ह्यात मागील आर्थिक वर्षात 16 रोजगार मेळावे घेण्यात आले. यामध्ये 167 कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांमध्ये 24 हजार 142 रिक्त पदे होती. रोजगार मेळाव्यासाठी 20 हजार 652 तरुण सहभागी झाले. तर प्रत्यक्षात 2 हजार 294 तरुणांनी नोकरी स्वीकारली. अजूनही कंपन्यांमध्ये सुमारे 22 हजार पदे रिक्त आहेत. संधी असूनही विविध कारणांमुळे तरुण नोकरी स्वीकारत नसल्याचे निरीक्षण जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने नोंदविले आहे.
बेरोजगार युवकांना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्याच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा योजना राबविली जाते. त्या अंतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून नोकरी करण्यास इच्छुक युवक, युवतींना नामवंत खासगी कंपन्या, कारखाने व उद्योगसमूहात रोजगाराच्या संधी मिळवून दिल्या जातात.
पुणे जिल्ह्यातही शेकडो कंपन्यांमध्ये हजारो पदे रिक्त असताना, रोजगार मेळाव्यात येणाऱ्या तरुणांचे प्रमाण कमी आहे. जिल्ह्यात गत आर्थिक वर्षात सोळा रोजगार मेळावे घेण्यात आले. त्यामध्ये सहभागी 167 कंपन्यांमध्ये 24 हजार रिक्त पदे असताना भरतीसाठी 20 हजार उमेदवार उपस्थित होते. मात्र, कंपन्यांमधील उपलब्ध रिक्त पदांचे प्रमाण पाहता रोजगार मेळाव्यांना उपस्थित राहिलेल्या आणि निवड झालेल्या उमेदवारांचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास येते. शासनाच्या नियमानुसार पंचवीसपेक्षा जास्त कामगार असलेल्या कंपन्यांनी त्यांच्याकडे असलेली रिक्त पदे संबंधित जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राला कळविणे बंधनकारक आहे. त्यानुसार कंपन्या जिल्हा कौशल्य विकास विभागाकडे रिक्त पदांची माहिती नोंदवितात.
आठवी ते इंजिनिअरसाठी नोकरी
रोजगार मेळाव्यात आठवी पास ते इंजिनिअर झालेल्या तरुणांसाठी नोकऱ्या उपलब्ध होत्या. त्यानुसार आठवी पास ते इंजिनिअर झालेले तरुण या मेळाव्यात सहभागी झाले. या तरुणांना उत्पादन व सेवा क्षेत्रातील विविध नामवंत कंपन्यांमध्ये किमान आठ हजार रुपये ते पंचवीस हजार रुपये मासिक पगाराची नोकरी मिळाली असल्याची माहिती कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांनी दिली.
जिल्ह्यात अनेक संधी
जिल्ह्यात एमआयडीसी तयार झाल्या आहेत. मागील 10 वर्षांपासून जिल्ह्यात अनेक लहान-मोठे उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत. याचबरोबर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनीही त्यांचे उत्पादन जिल्ह्यातील कारखान्यांमधून सुरू केले आहे. या व अशा अनेक कंपन्यांमुळे बेरोजगारांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज भासत आहे.
नोकरी नाकारण्याची ही आहेत कारणे…
कामाचे स्वरूप पसंत नसणे
पगाराची अवास्तव अपेक्षा ठेवणे
नोकरीचे ठिकाण घरापासून लांब
कामकाजाची वेळ पसंत नसणे
रात्रपाळी करण्यास नकार