मुंबई – गेल्या 30 वर्षापासून भारताचा विकास दर वेगाने वाढत आहे. मात्र हा विकास फक्त मध्यमवर्गीय आणि उच्च वर्गीयांचा होऊ नये. विकासाची फळे सामान्य जनतेला मिळाली पाहिजेत. अन्यथा यामुळे सामाजिक ताण तणाव वाढण्याचा धोका निर्माण होतो असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी सांगितले.
बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना कुमार म्हणाले की, काही कंपन्या आणि काही लोकांची श्रीमंती वाढल्यानंतर इतर लोक असंतुष्ट होतात. त्यामुळे विकासाची फळे सर्वांना समान पद्धतीने मिळतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे. त्याचबरोबर तरुणांची संख्या जास्त आहे. जर तरुणांना काम मिळाले नाही तर ते आपल्या ऊर्जेचा नकारात्मक वापर करण्याचा धोका निर्माण होतो.
चालू आर्थिक वर्षात विकास दर 9.2 टक्के राहील. 2023 मध्ये विकास दर 8.7 टक्के राहील. त्यानंतर भारताचा विकास दर 7.5 टक्के होईल असे त्यांनी सांगितले. मात्र या वाढीव विकासदराचा उपयोग खरोखरच सामान्य वर्गातील तरुणांना होत आहे का याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.
अन्यथा गरीब-श्रीमंत दरी वाढ होऊ शकते. त्याचबरोबर केवळ विकासाकडे लक्ष न देता हा विकास पर्यावरणाचे संतुलन बिघडवत नाही ना याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बरीच गुंतवणूक केली आहे. आता खासगी क्षेत्राने गुंतवणूकसाठी पुढे येण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले