पिंपरी -भामा-आसखेडचे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्यात येत आहे. त्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी चिखलीकरांना प्राधान्याने मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन रविवारी (दि. 11) चिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले.
चिखलीमधील जलशुद्धीकरण केंद्र पूर्णत्वास येत असताना वारंवार महापालिकेच्या अधिकऱ्यांकडून चिखलीला पाणीपुरवठा होणार नसल्याचे खुलासे होत होते. या प्रश्नी विकास साने यांनी निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करून महापालिका अधिकाऱ्यांकडून खुलासा मागून घेतला. त्यामध्ये पालिकेचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांनी चिखलीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र असले तरी, चिखलीला पाणी दिलेच पाहिजे, असे बंधनकारक नसल्याचे स्पष्ट केले. अधिकाऱ्यांची चिखलीच्या पाणीपुरवठ्याबाबत दुटप्पी भूमिका दिसताच विकास साने यांच्या नेतृत्वाखाली चिखलीकरांनी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनास चिखली परिसरातील रहिवासी, सोसायटींमधील नागरिक, चिखली ग्रामस्थ आणि महिला-भगिनींनी लक्षणीय उपस्थिती लावली होती. या रस्ता रोकोच्या माध्यमातून महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम करण्यात आले आहे. यावर आता महापालिका प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.