महाराष्ट्रातील 7 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायती आणि या ग्रामपंचायतींचे सरपंच यासाठी झालेली निवडणूक निश्चितच चुरशीची झाली, असे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होत आहे.
काही महिन्यांपूर्वी जेव्हा शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली आणि मुख्यमंत्रिपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले त्यानंतर प्रथमच अशा प्रकारचे शक्तिप्रदर्शन दाखवणारी निवडणूक होणार असल्याने ती निश्चितच महत्त्वाची होती. या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांची युती विरुद्ध महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष यांची ताकद यामधील संघर्ष हा महत्त्वाचा मानण्यात येत होता.
महाराष्ट्रातील ग्रामीण मतदारांनी दिलेला कौल पाहता त्यांनी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीला दिलासा देणारा कौल निश्चितच दिला आहे; पण हा ग्रामीण मतदार संपूर्णपणे या युतीच्या पाठीशी आहे, असेही नाही. कारण या निकालावर नजर टाकली तर बहुतेक सर्वच राजकीय पक्षांनी आपापले गड कायम राखले आहेत. ज्या पक्षांचे ज्या प्रदेशांमध्ये प्राबल्य होते त्या ठिकाणी त्यांनी चांगली कामगिरी केली आहे, असेच दिसते. ज्या तीव्रतेने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला यश मिळाले आहे तेवढ्या प्रमाणातील यश कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीला मिळालेले नाही असा भाजपाने दावा केला आहे.
याउलट महाविकास आघाडीनेही आपणच अधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. सरपंचपदाची थेट निवडणूक असो किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक असो या निवडणुकीमध्ये पहिला क्रमांक पटकावून भाजपने बाजी मारली आहे आणि भाजप आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्रितपणे मिळवलेले यश पाहता ही आघाडी पहिल्या क्रमांकावर आहे असेच दिसते. केवळ पक्षाचा स्वतंत्र विचार केला असता भाजपच्या पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यानंतर कॉंग्रेस आणि सर्वात शेवटी उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा क्रम लागलेला दिसतो. एकत्रितपणे विचार करायचा झाल्यास भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची ताकद आणि विरोधी महाविकास आघाडीची ताकद साधारणपणे सारखीच असल्याचे लक्षात येते. महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी ज्या नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. त्यानंतर गद्दार आणि खोकेवाले हे शब्द लोकप्रिय झाले आणि शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना निवडणुकीमध्ये मतदार जागा दाखवतील अशा घोषणा अनेक वेळा उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी केल्या असल्या, तरी ग्रामीण मतदारांनी दिलेल्या या कौलामध्ये मात्र तशा प्रकारचा कोणताही संकेत दिसत नाही.
अनेक ठिकाणी जर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये झालेली ग्रामीण राजकारणाची लढत पाहिली तर त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटानेच बाजी मारलेली दिसते. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांनी आपापल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतींमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले आहे, असेच दिसते. ग्रामीण राजकारण्याच्या या निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जातात, असे नाही उलट या निवडणुका अनेक वेळा गटवारच लढवल्या जातात. म्हणजेच एकाच राजकीय पक्षातील दोन गट या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये समोरासमोर असतात. त्यामुळे कोणताही गट जरी निवडून आला तरी तो त्या राजकीय पक्षाचाच विजय मानला जातो. पण गेल्या काही वर्षांपासून भाजपने जाणीवपूर्वक ग्रामीण राजकारणात शिरकाव करण्यासाठी आपल्या स्वतःच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मोहीम सुरू केल्याने इतर राजकीय पक्षांनासुद्धा तेच स्वीकारावे लागले होते. त्याचाच परिणाम म्हणून आता ग्रामीण राजकारणामध्येसुद्धा राजकीय पक्ष आपल्या चिन्हावर समोरासमोर उभे ठाकू लागले आहेत. आपले गड राखताना भाजपने विदर्भ, खानदेश या प्रदेशात वर्चस्व राखतानाच इतर काही प्रदेशांमध्येसुद्धा शिरकाव केलेला दिसतो.
दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मात्र नेहमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील आपले वर्चस्व कायम राखले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे मराठवाड्यात आणि कोकणातील काही ग्रामपंचायतींमध्ये यश मिळाले आहे. कॉंग्रेसलाही विदर्भातील काही ठिकाणी आणि राज्यातील इतर भागांत तुरळक यश मिळालेले दिसते. सध्यातरी जास्तीत जास्त ग्रामपंचायती जिंकून आणि जास्तीत जास्त सरपंचपदाची निवडणूक जिंकून पहिला क्रमांक पटकावून भाजपने निश्चितच इतर सर्व राजकीय पक्षांवर मात केली आहे, असे म्हणता येऊ शकते. ग्रामीण मतदारांचा हा कौल लक्षात घेता लवकरच जो शहरी मतदारांचा कौल घेतला जाणार आहे तोसुद्धा महत्त्वाचा मानला जाईल. भाजपकडे नेहमीच एक शहरी मतदारांचा पक्ष म्हणून पाहिले जाते; पण आता ग्रामीण राजकारणामध्येसुद्धा भाजपाने आपला प्रभाव वाढवायला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे लवकरच होणाऱ्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्येसुद्धा भाजपला आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. आगामी कालावधीमध्ये मुंबईसारख्या महत्त्वाच्या महापालिकेसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याने त्या निवडणुकीतील कौल हा सर्वात जास्त महत्त्वाचा ठरणार आहे. दीड ते पावणेदोन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा पाया या महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने घातला जाऊ शकतो. ग्रामीण मतदारांनी दिलेला हा कौल पाहता सर्वच राजकीय पक्षांना आगामी कालावधीसाठी आपल्या रणनीतीमध्ये काय बदल करावे लागतील याचा संदेश मिळाला असेल.
जे मतदार ग्रामपंचायतीसाठी मतदान करतात किंवा नगरपालिका आणि महानगरपालिकेसाठी मतदान करतात तेच मतदार नंतर विधानसभा आणि लोकसभेसाठीही मतदान करत असल्याने या मतदारांची काय मानसिकता आहे हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतून लक्षात येते. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर ग्रामीण मतदारांनी आपला कौल देऊन आपली मानसिकता निश्चितच स्पष्ट केली आहे आणि त्याची दखल सर्वांना घ्यावी लागणार आहे.