मुंबई : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण पुणे न्यायालयाने भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील घोटाळ्याची फेरचौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर याविषयी प्रतिक्रिया देताना खडसे यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यात सत्ता आणण्यात यशस्वी झाले आहेत. मात्र ते अद्याप रामराज्य आणू शकले नाहीत, असे खडसे म्हणाले आहेत.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना खडसेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला, दरम्यान, खडसे यांनी माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचा दावा यापूर्वीच केलेला आहे. दिवाळीच्या दिवशी श्रीरामाने रावणावर विजय मिळवला. ते विजय मिळवून परत आले होते. एकीकडे श्रीरामाने आज विजय संपादन केला होता. दुसरीकडे महाराष्ट्रातही शिंदे यांनी विजय संपादन केला आहे. मात्र श्रीराम यांनी जे रामराज्य आणले होते, ते रामराज आणण्यात शिंदे सरकार कमी पडत आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून भीषण चित्र निर्माण झाले आहे. या चार महिन्यांत शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. सर्वच क्षेत्रात महागाईने उचांक गाठला आहे. सर्वसामान्य माणसाचं जगणं कठीण झालं आहे. शिंदे सरकार आश्वसन देत आहे. मात्र कृतीत काहीही उतर नसल्याचे दिसत आहे, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
दरवर्षी दिवाळी येते. हा सण आपण उत्साहाने साजरा करतो. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. महागाईचे चटके जाणवत आहेत. अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील आहे, अशी खंतही खडसे यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, भोसरी भूखंड प्रकरणी पुणे न्यायालयाने फेरचौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडलेली आहे. आपल्याला राजकीयदृष्ट्या संपवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही मंत्र्यांकडून भोसरी भूखंड प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी यापूर्वी केला आहे.