राजगुरूनगर -पाभे (ता. खेड) गावात सलग 23 वर्षे “एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत असून या गावाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. पाभे ग्रामस्थ व युवकांनी 1997 पासून पुढाकार घेऊन एक गांव एक गणपती ही संकल्पना सुरू केली. जवळपास 40 घरांची लोकवस्ती असणाऱ्या पाभे गावात 1997 पर्यंत प्रत्येक घरात गणेशोत्सव साजरा करण्यात येत होता.
गाव छोटे मात्र, जो तो आपापल्यापरीने हा उत्सव साजरा करीत होते. ग्रामस्थांमध्ये एकीचे स्वरूप लोप पावत असल्याचे चित्र जाणवू लागल्याने तरुणांनी पुढाकार घेत ग्रामस्थांची बैठक घेऊन “एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सर्वांसमोर ठेवली.
गावात एकजूट आणि सर्व कामे एकीने केली जात असल्याने हा सणही एकत्र साजरा करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले अन् तेव्हापासून आतापर्यंत सलग 23 वर्षे ही संकल्पाने मोठ्या उत्साही वातावरणात राबवली जात आहे. सध्या करोना विषाणू संसर्ग आहे.
त्यावर मात करण्यासाठी पाभे गावात जनजागृती आणि काळजी घेतली जात आहे. यावेळी गणपती उत्सव काळातही ग्रामस्थांनी शासनाचे नियम व अटींचे पालन केले आहे.
त्यामुळे गावात भांडणे नाहीत
गावातील लग्न कार्य, दशक्रिया विधी, ग्राम देवतांची यात्रा. गावातील सुख दुःखाचे प्रसंग गावातील ग्रामस्थ व तरुण वर्ग एकीने सहभागी होत असतात. पुणे मुंबई येथे कामानिमित्ताने गेलेले गावकरी गावविकासात सक्रिय सहभागी होत असल्याने गावातील एकजूट टिकून आहे. यात्रा असो निवडणुका असोत या गावात भांडणे होत नाहीत.