करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून उपाययोजना
सातारा (प्रतिनिधी)- करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यास अडचणी येत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 309 ग्रामपंचायतींवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी शासकीय प्रशासक नियुक्त केले आहेत. ऑगस्ट महिन्यात एकूण 704 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार असून या ग्रामपंचायतींवरही प्रशासक नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात सुमारे 1541 ग्रामपंचायती असून मुदत संपेल तसा निवडणूक कार्यक्रम शासनाकडून लावण्यात येतो. यावर्षी मार्च महिन्यापासून करोनाचे संकट असल्याने करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून निवडणूक कार्यक्रम लावण्यात आला नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. पालकमंत्र्यांच्या शिफारशीनुसार योग्य व्यक्तीची प्रशासक पदावर निवड करावी, असे आदेश देण्यात आले होते. या निर्णयाला विरोध करत काही संघटना न्यायालयात गेल्या. शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्ती की विद्यमान पदाधिकारी यांची प्रशासक पदावर वर्णी लागणार याचा निर्णय न्यायालय करणार आहे. दि. 24 ऑगस्टपर्यंत निकाल राखून ठेवत तोपर्यंत शासकीय प्रशासक नेमण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 309 ग्रामपंचायतींवर शासकीय प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. सातारा तालुका 19, कोरेगाव 49, खटाव 01, माण 19, फलटण 41, खंडाळा 25, वाई 32, जावळी 21, महाबळेश्वर 14, पाटण तालुका 88 या ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्यानुसार उर्वरित ग्रामपंचायतींवरही शासनाच्या सूचनेनुसार प्रशासक नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती अविनाश फडतरे यांनी दिली.
करोना संकटकाळात निवडणूक प्रक्रिया राबवता येत नाही. ग्रामपंचायत मुदत संपल्याने अनेक ठिकाणी करोना उपाययोजना राबविण्यात अडचणी येण्याची शक्यता होती. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी शासकीय प्रशासकांची नियुक्ती केली आहे.
अविनाश फडतरे ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी.