सातारा -कास परिसरातील बांधकामे स्थानिकांची असून, कोणीही दुसऱ्याच्या जागेत अतिक्रमण केलेले नाही. पर्यटकांचा वाढता ओघ बघून तेथे हॉटेल व्यवसायाला ऊर्जितावस्था आली आहे. ज्या व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, त्यांची बांधकामे 0.5 प्रमाणे नियमित करण्यासंदर्भात मोजणी सुरू आहे. ती तात्काळ पूर्ण करण्यात यावी आणि प्रशासनाने हरित लवादापुढे वस्तुस्थिती मांडावी, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे केली आहे.
कास पठारावरील बांधकामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी चार आठवड्यांच्या आत निर्णय घ्यावा, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. याप्रकरणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कास पठारावरील हॉटेल व्यवसायिकांसमवेत जयवंशी यांची शुक्रवारी त्यांच्या दालनात भेट घेतली. या विषयावर सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या संदर्भात हरित लवादापुढे सकारात्मक बाजू मांडली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कास पठारावरील बांधकामांविरोधात ज्यांनी तक्रारी केल्या आहेत, त्यांनी काही गोष्टी समजून घ्याव्यात. तेथे कोणी कोणाच्या जागेत अतिक्रमण केलेले नाही. ज्या व्यावसायिकांना नोटिसा आल्या आहेत, त्यातील 99 टक्के व्यावसायिक भूमिपुत्र असून, त्यांनी त्यांच्याच जागेमध्ये बांधकामे केली आहेत. त्यासाठीचे परवाने आणि 0.5 प्रमाणे एफएसआय प्रमाणित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सहकार्याची भूमिका आहे. ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याची मागणी आम्ही केली होती. या मागणीला जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पर्यटक येथे फिरायला आणि मुक्कामासाठी येत असतील, तर येथे पायाभूत सुविधांचा विकास गरजेचा आहे. हॉटेल व्यवसाय वाढला, तरच पर्यटकांना सुविधा
मिळणार आहेत, हे त्या समाजसेवकांनी लक्षात ठेवावे. ज्या भूमिपुत्रांचे व्यवसाय वैध आहेत, त्यांनी आपापली बांधकामे प्रमाणित करून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा बांधकामांना अजिबात हात लावू देणार नाही.