नवी दिल्ली – पंजाबातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडी मार्फत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक करण्याची योजना केली गेली आहे असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. तथापि असल्या राजकीय हेतूने केल्या जाणाऱ्या कारवायांना आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की आम्हाला आमच्या सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की पंजाबच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्येंद्र जैन यांच्या अटकेची ईडीने तयारी सुरू केली आहे. मागेही ईडीने जैन यांच्या घरावर छापा टाकला होता. पण त्यात त्यांना काहींही आढळून आले नव्हते असे केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की ज्याज्यावेळी भाजपला पराभवाची भीती वाटते त्यावेळी ते अशा पद्धतीने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. आम्ही अशा कारवायांना घाबरत नाही.आम्ही काहीही गैर करीत नसल्याने आम्हाला घाबरून जाण्याचे काहीही कारण नाहीं असेही केजरीवालांनी म्हटले आहे.