मुंबई – विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सदस्यांनी हात वर करत त्यांची मतमोजणी करुन होणार असल्याने कदाचित भाजपला यात घोडेबाजार करता येणार नाही, हे त्यांना दुःख वाटत असेल. याविरोधात भाजपचे लोक राज्यपालांकडे धाव घेत आहेत हे दुर्दैवी आहे. पुढील काळासाठी देखील हीच पद्धत कायम राहील, याचे भाजपला दुःख वाटण्याचे कारण काय? असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना भाजपला लगावला आहे.
मंत्री पाटील पुढे म्हणाले की, राज्यसभेने ज्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे, त्याच तंतोतंत पद्धतीने आम्ही विधानसभेत निर्णय घेतला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात वर करुन मतमोजणी करत होणार आहे. याचे भाजपला दुःख वाटत असेल.
लोकशाहीत पारदर्शकता आणि महाराष्ट्रातील जनतेच्यादृष्टीने अतिशय चांगला निर्णय विधानसभेतल्या नियमात बदल करुन महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे असेही, मंत्री जयंत पाटील म्हणाले.