मराठीतील लघुकादंबरीकार विनायक कोंडदेव ओक यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळील हेदवी येथे 25 फेब्रुवारी 1840 रोजी झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांचे बालपण कष्टात गेले. जेमतेम तीन इंग्रजी इयत्तांपर्यंतचे शालेय शिक्षण त्यांना मिळाले होते. त्यानंतर त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले.
ब्रिटिश राजवट आल्यावर इंग्रजी शिक्षणाने अनेक लोकांना जीवनाची नवीन दालने उघडी झाली व त्यांनी नवशिक्षण प्रसारास सुरुवात केली. अशा लोकांमध्ये ओक यांचे नाव घेतले जाऊ लागले. तसेच लेखक म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी शिक्षक म्हणून सरकारी शिक्षण खात्यात अर्थार्जनासाठी नोकरीस प्रारंभ केला आणि अतिरिक्त उपशिक्षण निरीक्षक या पदावरून निवृत्त झाले.
मुलांना वाचनाची गोडी लागावी व शालेय शिक्षणाबरोबरच शाळेच्या बाहेरील ज्ञान मिळावे म्हणून मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत पुस्तके लिहिण्याचा विचार केला. शालेय शिक्षणाला जोड म्हणून पूरकवाचन काय देता येईल याचा त्यांनी विचार केला. पेशवे सरकार दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा देत असे. त्यामधे वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचाही समावेश असायचा.
लॉर्ड एल्फिन्स्टन या पहिल्या गव्हर्नरने यात सुधारणा करून ही प्रथा पुढे चालू ठेवली व त्यासाठी दक्षिणा फंड म्हणून सरकारात स्वतंत्र निधीची तरतूद केली होती. त्यातूनच शिक्षणास उत्तेजन व मराठी ग्रंथास पुरस्कार मिळू लागला. योग्य ग्रंथाची शिफारस करण्यासाठी सरकारने इ. स. 1851 मध्ये दक्षिणा प्राइझ कमिटी या नावाची एक समिती स्थापन केली. या कमिटीच्या प्रोत्साहनाने अनेक मराठी लेखकांना ग्रंथलेखन, मुद्रणप्रसार यांसाठी उत्तेजन मिळाले व मराठी भाषेमधे चांगल्या साहित्याची व साहित्यिकांची भर पडली.
इंग्रजीतील चांगल्या ग्रंथांची भाषांतरे मराठीत करवून घ्यावयाची आणि भाषांतरकारांस पुरस्कार द्यायचा कमिटीचा उद्देश होता. या कमिटीमार्फत त्यांच्या “लघुनिबंधमाला’ या पुस्तकास बक्षीस मिळाले. त्यांनी मधुमक्षिका अथवा अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांचा संग्रह हे अनेक इंग्लिश ग्रंथांच्या आधारावर माहितीपर पुस्तक लिहिले. हे पुस्तक गव्हर्नमेंट सेंट्रल बुक डेपोने प्रसिद्ध केले.
ओक यांनी “बालबोध’ हे पहिले मासिक वर्ष 1881 मध्ये सुरू केले. त्यांनी या मासिकातून 402 चरित्रे, 402 कविता, 402 निबंध, 371 शास्त्रीय निबंध व अन्य 850 विषयांची माहिती करून दिली. म्हणूनच त्यांना “बालवाङ्मयाचे जनक’ असे म्हटले जाते. त्यांनी “शिरस्तेदार’ या छोट्या कादंबरीतून लाच खाण्यापासून होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांचे विवेचन केले आहे. ललित लेखनाबरोबर त्यांनी काव्य लेखनही केले. वर्ष 1871 मध्ये संस्कृत तर काही इंग्रजी कवितांवर आधारित “पुष्पवाटिका’ नावाचा काव्यसंग्रह त्यांनी प्रसिद्ध केला.
“इतिहास तरंगिणी’, “हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास’, “फ्रान्स देशातील राज्यक्रांतीचा इतिहास’, अशी इतिहास विषयावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. तसेच “पीटर दी ग्रेट’, “सिकंदर बादशहा’, “ड्यूक ऑफ वेलिंग्टन’, “आल्फ्रेड दी ग्रेट’, “अब्राहम लिंकन’, “ग्लॅडस्टन’, अशा थोर पुरुषांची चरित्रे लिहिली. 9 ऑक्टोबर 1914 रोजी त्यांचे निधन झाले.