आज स्वामी विवेकानंद यांची जयंती. त्यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन म्हणूनही साजरी केली जाते. विवेकानंद आणि आधुनिक भारताचा संबंध दर्शविणारा हा लेख.
भारताच्या राष्ट्रीय इतिहासात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नवे पर्व ज्या महामानवाने सुरू केले त्यांचे नाव नरेंद्रदत्त होय. रामकृष्ण परमहंस यांच्या परिसस्पर्शाने नरेंद्र दत्तांचे सोने झाले. या तेजस्वी तरुणाचे नाव स्वामी विवेकानंद असे ठेवले. रामकृष्ण परमहंस म्हणाले होते की, तुम्हाला तुमचे आयुष्य भारतीय संस्कृतीच्या प्रसारासाठी द्यावयाचे आहे. वेद, गीता, उपनिषदे, अरण्यके या सर्वांचे सार घेऊन तसा संदेश तुम्हाला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचवायचा आहे. भारतीय संस्कृतीची ध्वजा तुम्हाला उंच उंच फडकवत ठेवायची आहे. स्वामी विवेकानंदांनी स्वामी रामकृष्ण परमहंसाकडून घेतलेला वसा पुढे आयुष्यभर चालवला.
स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेतील शिकागोच्या परिषदेत 1 नव्हे तर 17 व्याख्याने दिली. पण अनेकांना स्मरणात राहाते ते शेवटच्या पाच मिनिटांचे भाषण. विवेकनंदांची 17 भाषणे म्हणजे भारताच्या भाग्योदयाचा एक पर्वकाळ किंबहुना स्वातंत्र्याची सनद म्हटली पाहिजे. याचे कारण असे की स्वामी विवेकानंदांनी शिकागो परिषद गाजवली ती त्यांच्या वक्तृत्वाने, कर्तृत्वाने आणि विचार दर्शनाने. खरे तर ते भारताचे प्रतिनिधी म्हणून शिकागोत गेलेच नव्हते. कुणीतरी अन्य व्यक्ती भारताचे प्रतिनिधित्व करत होती. पण विवेकानंदांना जेव्हा कळले की अमेरिकेत अशी एक धर्मपरिषद होत आहे तेव्हा त्यांनी पदरमोड करून आणि इतर राजामहाराजांकडून मदत घेऊन अमेरिकेचा दौरा बोटीने करायचा ठरवले. तब्बल एक महिन्याने अमेरिकेत पोहोचले ते काही महिन्यांसाठी. या काळात विवेकानंद बोलत राहिले आणि अमेरिका डोलत राहिली.
विवेकानंदांनी संपूर्ण पश्चिम गोलार्धात आपल्या विचारांचे वादळ निर्माण केले. त्यांच्या वाणीने, विलोभनीय व्यक्तिमत्त्वाने आणि तेजःपुज प्रतिभेने यशाचे शिखर गाठले. अमेरिकेतील त्यांची भाषणे ऐकून अमेरिकेतील वृत्तपत्राने त्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली. त्यावेळच्या बुकानंद टाइम्स या वृत्तपत्राने असे लिहिले होते की “त्या साधूचे भाषण ऐकल्यानंतर आमची अशी बालंबाल खात्री झाली आहे की भारतीय लोक जंगली आणि रानटी मुळीच नाहीत. इंग्रज लोक समजतात त्याप्रमाणे ते जंगली मुळीच नाहीत. उलट ते सभ्य आणि सुसंस्कृत आहेत. त्या साधू संन्याशाची भाषणे ऐकल्यानंतर आम्हाला खात्री पटली आहे की हिंदुस्थान स्वतंत्र होईल आणि तिथे पार्लमेंट तयार होऊन ते स्वतःच स्वतःवर राज्य करतील’ बुकानंद टाइम्स केलेले हे भाकित खरे ठरले.
11 सप्टेंबर 1883 मध्ये विवेकानंदांनी शिकागोत व्याख्यान दिले होते तो दिवस भारतभाग्य विधाता दिवस म्हटला पाहिजे. कारण यानंतर 50 वर्षांनी म्हणजे 1947 साली हिंदुस्थान स्वतंत्र झाला आणि बुकानंद टाइम्सचे भाकित खरे ठरले. स्वामी विवेकानंदांनी जी व्याख्याने दिली, जी टिपणे लिहिली त्यांचे 11 खंड विविध भाषांत भारतीय रामकृष्ण मिशनने प्रकाशित केले आहेत. याशिवाय “कोलंबो ते अल्मेडा’ या नावाची त्यांची व्याख्याने एकत्र संपादित केले आहेत. अर्थात हे सर्व साहित्य इंग्रजी भाषेत आहे. विवेकानंदाच्या प्रतिभाशक्तीची आणि सखोल मीमांसेची, दूरदृष्टीचे प्रतिबिंब या लेखनात आपल्याला पहायला मिळते.
शिकागोतील शेवटच्या भाषणात विवेकानंदांनी सांगितले होते की, 21व्या शतकात भारत जगावर राज्य करेल ते संस्कृतीच्या आधारावर नव्हे तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे. आज भारत हा अवकाशात उपग्रह सोडणारा जगातील सर्वात मोठा देश झाला आहे. भारताने अणुविद्या मिळवली आहे. अणुबॉम्ब बनवला आहे आणि भेदक क्षेपणास्त्र बनवली आहेत. आंतरखंडीय क्षेपणास्त्रातसुद्धा भारताची स्पर्धा कुणी करू शकणार नाही इतकी प्रगती भारताने केली आहे. 21व्या शतकात भारत कसा असावा हे विवेकानंद यांचे भाकित आता पूर्ण होत आहे.
विवेकानंद हे वेदांताचे भाष्यकार होते. त्यांनी अमेरिकेतील लोकांना तात्विक वेदांत सांगितला आणि हिंदुस्थानातील लोकांना व्यवहार्य वेदांत सांगितला. धर्म म्हणजे तरी काय; तर माणसामधील सुप्त गुणांना जागृत करणारी शक्ती होय. विवेकानंदांनी शिक्षणाची देखील अशी अद्भुत व्याख्या केली. शिक्षण म्हणजे आत्म्याचा लख्ख प्रकाश त्याला परत मिळवून देणे. विवेकानंदांनी अमेरिकेत केलेल्या भाषणात मर्यादापुरुषोत्तम प्रभु रामचंद्र, युगंधर पूर्णवादी पुरुष भगवान श्रीकृष्ण, अहिंसेचे प्रवर्तक आणि शांतीदूत महावीर, जगाला अष्टदीपाचा मार्ग दाखवणारे गौतम बुद्ध या सर्वांवर त्यांनी भाषणे दिली. अमेरिकेत त्यांनी दिलेल्या व्याख्यानामध्ये “खरा बौद्ध धर्म कोणता’ हे भाषण तर अत्यंत चिंतनीय आहे.
विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीचा दूत म्हणून सबंध जगभर प्रवास आणि संचार केला त्यातून त्यांचे एक दूरदर्शित्व दिसून येते. भारतीय असल्याबद्दल लाज बाळगू नका, भारतीय असल्याचा अभिमान बाळगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. भारतीयांचा तेजोभंग पाश्चात्यांच्या आगमनाने झाला आणि लोक गुलामीच्या मानसिकतेमध्ये होते. डोळे उघडून जगाकडे पहावे, आपला आत्मविश्वास जागृत करावा असे छातीठोकपणे सांगण्याची धमक असूनही लोक सांगत नव्हते. विवेकानंदांनी ही अभिव्यक्ती जागृत केली.
विवेकानंदांनी नवभारताचे जे रूप पाहिले होते ते शोषणमुक्त कृषी औद्योगिक समाज म्हणून. आज जगामध्ये भारत तरुणांचा देश बनला आहे. तथापि, भारतीय तरुण कसा असावा याबाबत विवेकानंदानी केलेले भाकित मोठे वैशिष्ट्यपूर्ण, सुसंगत आणि प्रत्ययी आहे. तरुणांच्या बाहूंमध्ये वाघाचे बळ हवे. त्यांच्या मज्जारज्जूमध्ये पोलादी ताकद हवी. तसेच त्यांच्या मेंदूमध्ये विलक्षण छेद देण्याची ताकद हवी. विवेकानंदांना अभिप्रेत असलेला, उद्याच्या बलशाली भारताचा अग्रदूत असलेला, मजबूत स्तंभ असलेला तरुण आज उभा आहे. विवेकानंदांनी म्हटले होते की, तरुणांनी तोपर्यंत चालत रहावे जोपर्यंत त्यांचा ध्येयबिंदू साध्य होत नाही. विवेकानंदाचा भर व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर, चारित्र्य संघटनावर आणि समग्र परिवर्तनावर होता.
अमेरिकेतील शिकागो आणि हावर्ड विद्यापीठाने विवेकानंदांना प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले होते. मात्र त्याला आदरपूर्वक नकार देऊन विवेकानंदांनी असे कळवले होते की, आमच्या देशात एकदा आम्ही साधूसंतांची वेशभूषा स्वीकारली की पुन्हा आम्ही भौतिक विश्वात जाऊ शकत नाही. विवेकानंदांचा हा बलदंड आत्मविश्वास आणि ध्येयनिष्ठा पाहता कुठल्याही प्रलोभनाला ते कसे बळी पडले नाहीत याची आपल्याला प्रचिती येते. ते म्हणाले होते की आम्हाला स्त्रीपुरुष समानतेची गरज आहे, आम्हाला सर्वांसाठी शिक्षण हवे आहे, मंदिर प्रवेश सर्वांनाच असला पाहिजे. विवेकानंदानी श्रमिकांची दुःखे जाणली, श्रमिकांचे प्रश्न जाणले. ते म्हणत की, ज्याला लोक गरीब माणूस म्हणतात तिथे मी ईश्वर पाहतो. झोपडी झोपडीपर्यंत वेदांत आणि विज्ञान पोहोचत नाही तोपर्यंत दरिद्री नारायणाचा नवकोट नारायण होणार नाही.
स्वामी विवेकानंद हे भारतीय संस्कृतीचे भाष्यकार होतेच पण ते विज्ञान तंत्रज्ञानाचे पुरस्कर्ते होते. विजय भटकर यांनी जेव्हा परमसंगणक बनवला होता तेव्हा त्यांना पत्रकारांनी विचारले होते की, तुमचे प्रेरणास्थान काय? तेव्हा त्यांनी सांगितले की विवेकानंदांनी 21 व्या शतकात भारत जगावर विज्ञान तंत्रज्ञानाने राज्य करेल असे भाकित केले होते आणि ते आज मी खरे करून दाखवले. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन असोत अथवा डॉ. एपीजे अब्दुल कलाम असोत; ते विवेकानंदाच्या स्वप्नातील तरुण होते असे म्हणता येईल. नजीकच्या काळात भारताला जगाचे नेतृत्व करायचे आहे. जगाचे हे नेतृत्व करण्यासाठी शेती, उद्योग, शिक्षण या तीनही क्षेत्रात सर्वोच्च शिखरे गाठावी लागतील. विवेकानंदाचा शेतकऱ्यांच्या सृजनक्षमतेवर, काळ्या आईची सेवा करण्याच्या धारणेवर फार विश्वास होता. तसेच आपल्याला आपला भाग्योदय करायचा असेल तर आपली सर्वच विद्यापीठे नालंदा, तक्षशीला यांच्या तोडीची झाली पाहिजेत. आपले शिक्षण दीपस्तंभाप्रमाणे असले पाहिजे.
देशामध्ये आर्थिक उर्जित अवस्थेला एक दिशा दिली पाहिजे. या सर्व बाबतीत यशस्वी झालो आणि नियोजित प्रयत्नांच्या आधारे आपण सर्वश्रेष्ठ उंची गाठू शकलो तर स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचे खऱ्या अर्थाने फलित झाले असे म्हणता येईल.