आयटी संस्कृतीचा उपासक आणि आंध्रचा विकासपुरूष म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते बिल गेट्सपर्यंत अनेकांचे आकर्षण ठरलेल्या चंद्राबाबूंचे नावही आता ऐकू येत नाही.
आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेसची सत्ता आहे. परंतु जगनमोहन यांच्या मातोश्री विजयाम्मा यांनी पक्षाचे मानद अध्यक्षपद नुकतेच सोडले आहे. आपल्या मुलीला आधार देण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांची कन्या शर्मिला यांनी वर्षभरापूर्वी “वायएसआर तेलंगण’ या पक्षाची स्थापना केली. त्यामुळे मायलेकी आता एकत्र आल्या आहेत. परंतु आंध्रमध्ये तेलुगू देसम आणि वायएसआर यांच्यात स्पर्धा आहे. गेल्या वर्षी सत्ताधारी वायएसआर कॉंग्रेसच्या नेत्यांकडून आपली पत्नी भुवनेश्वरी हिच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले गेल्याचा आरोप करून, तेलुगू देसमचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी “ही विधानसभा नसून द्रौपदीचा अवमान करणारी कौरवसभा आहे’, असा हल्लाबोल केला होता. त्यावेळी चंद्राबाबूंनी अश्रुपात केला आणि पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावरच विधानसभेत येण्याची गर्जना केली. अर्थात, दक्षिणी राज्यांत अशी प्रतिज्ञा करणारे चंद्राबाबू हे पहिले नेते नाहीत. यापूर्वी त्यांचे सासरे एन. टी. रामाराव, दिवंगत माजी मुख्यमंत्री आणि जगनमोहन यांचे पिता वायएस राजशेखर रेड्डी तसेच तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनीही अशी प्रतिज्ञा केली होती.
आंध्र प्रदेशची सत्ता काबीज करण्याची स्वप्ने रंगवणाऱ्या चंद्राबाबूंची वाट सोपी नाही. तेलुगू देसमचा राजकीय आलेख घसरला असून, चंद्राबाबूंवर अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे. वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारात चंद्राबाबू यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. तेव्हा त्यांना “किंगमेकर’ असे म्हटले जात असे. परंतु गुजरात दंगलींचा मुद्दा पुढे करून त्यांनी भाजपशी फारकत घेतली आणि 2014 मध्ये पुन्हा मोदींशी सहकार्य केले. त्यानंतर, आंध्र प्रदेशला विशेष दर्जा दिला जात नाही, म्हणून त्यांनी पुन्हा भाजपशी फारकत घेतली. परंतु गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जगनमोहन यांनी बाजी मारून नायडूंच्या तेलुगू देसमचा बोऱ्या वाजवला. सध्या तेलुगू देसमकडे 3 खासदार आणि 23 आमदार एवढेच बळ असून, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्ताही त्यांनी गमावली आहे.
परंतु आता चंद्राबाबू परत एकदा भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असून, 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मदत करून राज्यातील सत्ता पुन्हा हस्तगत करण्याचा त्यांचा बेत आहे. मात्र काही काळापूर्वी पक्ष कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दिल्लीवारीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांना भेटही मिळू शकली नव्हती. आयटी संस्कृतीचा उपासक आणि आंध्रचा विकासपुरूष म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते बिल गेट्सपर्यंत अनेकांचे आकर्षण ठरलेल्या चंद्राबाबूंचे नावही आता ऐकू येत नाही.
या पार्श्वभूमीवर, तीस वर्षांपूर्वी विजयवाडा येथे अस्तित्वात आलेल्या “एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस’चे नामांतर करून, या विद्यापीठास आपले पिता राजशेखर रेड्डी यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयावर त्यांच्या भगिनी शर्मिला यांनीही टीका केली आहे. तेलुगू देसमला तर हा निर्णय बिलकुल आवडलेला नाही. परंतु या टीकेला उत्तर देण्यासाठी म्हणून वायएसआर पक्षाने राज्यात ठिकठिकाणी पोस्टर्स लावून चंद्राबाबूंनी आपले सासरे एनटीआर यांच्याविरुद्ध कसे बंड केले होते, याची लोकांना आठवण करून दिली. 1995 साली वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर “वुई डोंट नीड एनटीआर’ असे चंद्राबाबूंचे उद्गार प्रसिद्ध झाले होते. या वृत्तपत्रांच्या पहिल्या पानाच्या फोटोकॉपीजही भिंतीभितींवर चिकटवून आंध्रमधील सत्ताधारी पक्षाने तेलुगू देसमवर प्रतिहल्ला चढवला आहे.
1990च्या त्या दशकात चंद्राबाबू व आणखी काही आमदारांनी मिळून एनटीआरविरुद्ध बंड पुकारले. याचे कारण, एनटीआर यांनी राज्यशकट आपली दुसरी पत्नी एन. लक्ष्मीपार्वती यांच्याकडे सोपवण्याचे ठरवले होते. वायएसआरच्या या पोस्टर्समुळे संतप्त झालेल्या चंद्राबाबूंनी ठिकठिकाणी “भारतीपे’ हे शब्द असलेली पोस्टर्स अडकवली. जगनमोहन यांच्या पत्नीचे नाव वायएस भारती असे आहे. या पोस्टर्सवर “लिकर मनी ऍक्सेप्टेड हियर’ असेही लिहिण्यात आले होते. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे शिवसेनेच्या दोन गटांत कमालीची कटुता निर्माण झाली असून, रोजच्या रोज आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातही फैरी झडत आहेत. त्याच धर्तीवर आंध्रमध्ये तेलुगू देसम आणि वायएसआर कॉंग्रेस यांच्यात हाणामाऱ्या सुरू असून, एकेकाळी आंध्रमध्ये सत्ता गाजवणारा कॉंग्रेस पक्ष तिथे अस्तित्वशून्य बनला आहे.
तेलुगू देसमला 41 वर्षे झाली असून, 29 मार्च 1982 रोजी तेलुगू अस्मितेसाठी पक्षाची स्थापना झाली होती. जगनमोहन रेड्डी सरकारमुळे आंध्रवर संकट कोसळले असून, आपल्या या मातृभूमीच्या पुनर्निर्माणासाठी सज्ज होण्याचे आवाहन चंद्राबाबू यांनी केले आहे. राज्याचा विकास, विविध योजनांमार्फत जनकल्याण आणि समाजाच्या विविध घटकांत सत्तेचे समान वाटप, या धोरणांवर चंद्राबाबूंचा भर आहे. विशेष म्हणजे, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि आखाती राष्ट्रांतही तेलुगू देसमच्या शाखा आहेत आणि तेथेही पक्षाचा वर्धापन दिन दरवर्षी साजरा केला जातो.
एकेकाळी रात्री अपरात्री वेगवेगळ्या देवांची अनुष्ठाने करणाऱ्या आपल्या मुख्यमंत्री असलेल्या सासऱ्याला, म्हणजेच एनटीआर यांना घरी बसवून चंद्राबाबूंनी सत्ताशकट हाती घेतला होता. त्यावेळी एक आधुनिक दृष्टीचा तरुण मुख्यमंत्री मिळाला, अशी आंध्रजनांची भावना झाली होती. मात्र त्याच चंद्राबाबूंनी एकदा, “तुम्हाला जास्त मुले होऊ द्या, म्हणजे आंध्रची लोकसंख्या तरुण राहील आणि तरुण हातांचा तुटवडा पडणार नाही’, असे भंपक वक्तव्यही केले होते. आंध्रमधील नक्षलवाद आता कमी झाला असला, तरी राज्याच्या प्रगतीचा वेग समाधानकारक नाही. दोन पक्षांच्या स्पर्धेत आंध्र प्रदेशच्या प्रगतीस बाधा येऊ नये, म्हणजे मिळवली.