-हिमांशू
लग्नात आहेर देण्याची पद्धत शहरी भागात हळूहळू कमी होत असली, तरी आजही असंख्य लोकांना आहेर दिल्याशिवाय लग्नाला जाऊन आल्यासारखं वाटतच नाही. “कृपया भेटवस्तू, पुष्पगुच्छ आणू नयेत,’ असं प्रेमळ वाक्य हल्ली अनेक लग्नपत्रिकांमध्ये तळाशी छापलेलं असतं.
एकाच दिवशी दोन लग्नांना जायचं असेल, तर काही चाणाक्ष मंडळी अशा पत्रिकेला प्राधान्य देतात. परंतु लग्नात थेट सरकारनेच आहेर दिला तर..? “”आपण उभयता विवाह करीत आहात आणि हे एक राष्ट्रीय कार्य असल्यामुळे आपणास सरकारकडून शुभेच्छांसह ही प्रेमाची भेट देण्यात येत आहे. कृपया स्वीकार व्हावा,” असा मजकूर लिहिलेला बंद लिफाफा वधुवरांनी फोडावा आणि आत तब्बल चार लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम असावी… क्या बात है!
किमान भारतात तरी हे दिवास्वप्नच मानलं जाईल. आपण लोकसंख्येच्या दृष्टीनं तर गडगंज आहोतच; शिवाय आपल्याकडे तरुणांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे विवाहेच्छुकांची संख्याही अफाट आहे. करोनाच्या काळात तर अनेक विवाहेच्छुक इतके संतापले आहेत, की चुकूनमाकून त्यांना विषाणू दिसला, तर ते त्याला गोळीसुद्धा घालतील. परंतु जगाच्या पाठीवर असे काही देश आहेत, जिथं लोकसंख्या अपुरी आहे आणि विवाहेच्छुकही अत्यल्प आहेत. जपान हा त्यापैकीच एक. घटता जननदर आणि वृद्धांची अफाट संख्या या अडचणीवर मात करण्यासाठी जपानने नवा फंडा शोधलाय.
लग्नाला इच्छुक असलेल्या जोडप्यांना जपान सरकार आता सहा लाख येन म्हणजे जवळजवळ सव्वाचार लाख रुपये देणार आहे. लवकरात लवकर मुलं जन्माला यावीत आणि घटत्या जननदराच्या समस्येवर तोडगा निघावा, ही जपानमधील गरज आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये सगळ्यात कमी म्हणजे 8 लाख 65 हजार मुलं जन्माला आली. गेल्या वर्षी 1.42 इतका असलेला जननदर यावर्षी 1.80 पर्यंत वाढेल, या आशेवर सरकार आहे.
एकतर लोकसंख्या कमी आणि त्यात वयोवृद्धांची संख्या जास्त ही जपानची डोकेदुखी आहे. शतायुषी लोकांची संख्याही तिथं जास्त आहे. जननदर असाच राहिला तर वीस वर्षांनी जपानमध्ये वृद्धांची संख्या 35 टक्के होईल, असा अंदाज असून, तो धोका टाळण्यासाठी जपानमध्ये पावलं उचलायला सुरुवात झालीय. लग्न करणाऱ्यांना मोठी रक्कम देऊ करणे हा त्याचाच एक भाग आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या जोडप्याचं वय चाळीसपेक्षा अधिक असता कामा नये, अशी अट आहे. रोख बक्षीस मिळवण्यासाठी दोघांच्या कमाल एकत्रित उत्पन्नाविषयीही काही अटी सरकारने घातल्यात. पण, जपानमध्ये बहुतांश युवक-युवती लग्न करायलाच नाखूश आहेत, हे आपल्याकडे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या विवाहेच्छुकांना कदाचित पटणारसुद्धा नाही.
संशोधन आणि सर्वेक्षण करणाऱ्या एका संस्थेने जपानमधल्या युवकांच्या मनाचा कानोसा घेण्याचा प्रयत्न 2015 मध्ये केला होता. 25 ते 34 वयोगटातल्या तरुण-तरुणींना लग्नाला नाखूश असण्याची कारणे विचारली गेली, तेव्हा बहुतांश मुलामुलींनी उत्तर दिलं होतं, “पैसे नसल्यामुळे लग्न करायचे नाही असे ठरवलंय!’ म्हणून हा सरकारी आहेर! जगाच्या पाठीवर लोकसंख्या वाढवण्यासाठी लग्नानंतर दीड वर्षाची पगारी रजा देण्यापासून बाळाच्या जन्माबद्दल रोख बक्षीस देणारे देश आहेत, हा आम्हा भारतीयांसाठी केवळ स्वप्नवत्!