रत्नागिरी- नाणार येथे होणारा रिफायनरी प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला असतानाच त्या भागात 2001 मध्ये खरेदी झालेल्या जमिनीच्या व्यवहारांची चौकशी ईडीने सुरू केली आहे. राज्यातील एका बड्या मंत्र्यांच्या सीएची गेल्या महिन्यात दोनदा ईडीने चौकशी केलीअसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या मंत्र्याच्या मागे यापुर्वीच ईडीचा ससेमिरा लागला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या जमिनीच्या व्यवहाराचा संबंध या मंत्र्याच्या उत्पन्नाशी जोडण्याचा ईडीचा प्रयत्न होता. मात्र त्यात त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. कारण हा प्रकल्प येण्याच्या खूप आधी जमीन खरेदी झाली होती. तसेच त्याकाळात हा सीए त्या मंत्र्याचे काम पहात नसल्याचे ईडीने मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात केलेल्या चौकशीत पुडचे पाऊल टाकले नसल्याचे बोलले जात आहे.
राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरात 200 एकर जागा खरेदीबाबत ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा, राजापूर तालुक्यातील पश्चिम भाग, कोंड्ये गावातील जमीन व्यवहारांची चौकशी झाली आहे.
महाविकास आघाडीतील अनेक नेते आतापर्यंत ईडीच्या चौकशीत अडकले आहेत. एकमागोमाग एक नेत्यांच्या या चौकशीवरुन महाविकासआघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. राहुल कनाल आणि यशवंत जाधव यांच्यावर आयटीची धाड पडली होती तर प्रताप सरनाईक आणि संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने जप्ती आणली आहे. त्यामुळे भविष्यात शिवसेना ईडीच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची शक्यताराजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.