वाल्हे – मागील महिन्यापासून वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात चिकुनगुनिया, डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले होते. सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी मागील महिन्यापासून गावातील खासगी रुग्णालयात डेंग्यू,
चिकुनगुनियाचे रुग्ण वाढले असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून गावात दर बुधवारी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन ग्रामपंचायती मार्फत करण्यात आले आहे.
डेंग्यू, चिकुनगुनियाची साथ आटोक्यात आणण्यासाठी वाल्हे गावातील, तसेच परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील, नागरिकांचे व घरांचे सर्वेक्षण आशा स्वयंसेविका व आरोग्य विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला आहे.
वाल्हे ग्रामपंचायतीने परिसरात धुरळणी, फवारणी केली. तसेच परिसरात पावसाने वाढलेल्या गवतावर तनाशक फवारणी केली आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांची जनजागृती केली जात आहे.
दरम्यान, डेंग्यू, चिकुनगुनिया , झीका, या सारख्या रोगांचा प्रादुर्भाव डासा मार्फत होत असून, दिवसेंदिवस आजार भयंकर रूप धारण करीत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोरडा दिवस पाळण्यात येणार आहे. तरी कुणीही जास्त दिवसासाठी पाण्याची साठवणूक करू नये.
घराच्या छतावर अथवा आजुबाजुला पडलेले टायर, रिकामे फुटके भांडे, ड्रम, प्लॉस्टिक आदी वस्तूंमधे जास्त काळ पाणी साचून राहिल्याने डासांची उत्पत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.
घर, परिसरात स्वच्छता ठेवावी महामार्ग तसेच गॅरेज, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदाणी, फ्रीज, कुलर्सच्या ट्रेची स्वच्छता ठेवावी. तसेच नागरिकांना स्वच्छता ठेवण्याचे आवाहन ग्रामपंचायती मार्फत सरपंच अमोल खवले, उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे, ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले आदींनी केले आहे.