महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचवणार
मुंबई : शिवकालीन इतिहासावर आधारीत तयार करण्यात आलेल्या “तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहून महाराष्ट्रातील किल्ले, विस्मरण झालेल्या शूरवीरांची गौरवगाथा आणि पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. तसेच चित्रपटाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची माहिती देश-विदेशात पोहोचविण्यासाठी पर्यटन विभागाने पुढाकार घेतला आहे.
राज्यात व्यावसायिक आणि प्रोत्साहनपर पर्यटन उपक्रम राबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाने “तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटासह भागीदारी केली आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांचे निकटवर्ती सहाय्यक आणि विश्वासू तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे.
पर्यटन संचालनालयाने आपल्या समृद्ध वारशाचा गौरव साजरा करण्यासाठी जनतेला राज्यातील दुर्लक्षित सौंदर्याकडे आकर्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
यासाठी पर्यटन संचालनालयाने चित्रपटाचे मुख्य अभिनेते अजय देवगण यांचे सहकार्य घेतले आहे.
या माध्यमातून प्रेक्षकांना तान्हाजींसारख्या योद्धांच्या अद्भुत शौर्याची आठवण करून देणाऱ्या किल्ल्यांना भेट देण्याचे अश्वासित केले आहे. अशा योद्ध्यांच्या आठवणी अजूनही महाराष्ट्राच्या मौल्यवान किल्यांमध्ये आहेत. एक को-ब्रॅंडेड टीव्हीसी तयार केली आहे जो टीव्ही, सिनेमा ऍडव्हर्टायझिंग आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे.
किल्ल्यांसंदर्भात फोटो आणि व्हिडिओ स्पर्धा
या अनोख्या उपक्रमाचा विस्तार म्हणून पर्यटन संचालनालयाने महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ स्पर्धादेखील सुरू केली आहे. हौशी तसेच व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी ही स्पर्धा खुली आहे. यासंबंधी अधिक माहिती महाराष्ट्र टूरिझमच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडल्सवर उपलब्ध आहे.