शर्मिला जगताप
नाटक हे समाजाचेच एक अंग आहे. नाटकातील पात्रे जिवंत असतात. आपल्या समर्थ अभिनयाने ती पात्रे नाटक उभे करतात. एकच नाटक अनेक वेळा पाहिले तर प्रत्येक वेळी वेगळा अनुभव येतो, वेगळी अनुभूती येते. नाटकात काही तरी अलौकिक आणि अद्भुत असे असते. कल्पित आणि सत्य यांचे बेमालूम मिश्रण त्यात आढळून येते. नाटकात जीवनाचे दर्शन घडते आणि जीवनाला उजाळा मिळतो. म्हणून नाटकाला पाचवा वेद म्हणतात. जे नाटक एकाच वेळी सर्वांचे संतर्पण करते ते उत्कृष्ट नाटक होय.
संसारात तडतोड अत्यंत आवश्यक असते. दुसऱ्याचे मन समजावून न घेता प्रत्येकजण जर संसारात स्वतःच्याच मनाला वाटेल तसा वागू लागला, तर संसार करणे अशक्य होते. अशा एका मन मानेल तशा वागणाऱ्या, दुसऱ्याला समजावून न घेता केवळ संशयाने माथे भडकावून घेणाऱ्या तापट माणसाच्या संसाराची कशी अधोगती होते, हे “हे रंग मानवाचे’ या नाटकात दाखविले होते. मुंबईतील एका चाळीत शंकरचे मध्यमवर्गीय कुटुंब राहत असते.
शंकर अत्यंत तापट व सनातनी विचारांचा असतो. राधा या त्याच्या पत्नीला स्वतःच्या मनातील व्यथा मनमोकळेपणाने सांगण्यासाठी तिच्या सुदैवाने भास्कर नावाचा एक मित्र लाभतो. त्याच्याशी तिची निर्मळ मैत्री असते. परंतु चाळीतील शेजाऱ्यांनी पिकविलेल्या खोट्यानाट्या अफवांवर विश्वास ठेवून शंकर राधाकडे संशयाने बघतो. त्याची तरुण मुलगी लता हिचाही त्याला संशय येतो. एकदा राधा व भास्कर हास्यविनोद करीत असताना शंकर अचानक येतो व दोघांचाही खून करतो.
अखेर त्याला पकडल्यावर स्वतःच्या कृत्याचा त्याला पश्चाताप होतो आणि नाटक संपते. हे तीन अंकी नाटक होते. या शोकांतिकेला चाळीतील डॉक्युमेंटरीसारखे स्वरूप दाखविले आहे, ते वास्तववादी आहे. साधारणतः पाच-सहा दशकांपूर्वीचे हे रंगमंचावरचे नाटक असले तरी आजच्या वास्तववादी समाजाचे चित्र दाखविते. आजही केवळ चारित्र्याच्या संशयावरून कितीतरी “राधा’ सत्य न जाणता तापट “शंकरा’च्या हातून बळी पडतात.