मुंबई :- मुंबईतील जेजे रुग्णालयाच्या नेत्रोपचार विभागातील ९ वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेला सामूहिक राजीनामा, रुग्णालयातील मार्डच्या ७५० निवासी डॉक्टरांनी पुकारलेला बेमुदत संप, जेजे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या अंतर्गत वादामुळे रुग्णालयातील रुग्णसेवेवर, राज्याच्या आरोग्यसेवेवर होत असलेला दुष्परिणाम, यासंदर्भात राज्याचे हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री, आरोग्यमंत्री यांनी तत्काळ सर्वमान्य तोडगा काढावा आणि रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे.
पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की , हाती मिळालेल्या माहितीनुसार, त्यातून असं समजतं की डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह नऊ वरिष्ठ डॉक्टरांनी, डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडून सुरु असलेल्या छळाला, असहकार्याला कंटाळून राजीनामे दिले आहेत. जेजे हॉस्पिटलसारख्या प्रतिष्ठित, लोकोपयोगी आरोग्य संस्थेच्या वरिष्ठ डॉक्टरांमध्ये असा वाद असणं योग्य नाही. हा वाद राज्याच्या आरोग्यसेवेसाठी मारक असल्यानं ताबडतोब थांबला पाहिजे.
अशा प्रकारचे वाद चिघळू न देता तातडीनं मिटवले पाहिजेत. यावर समाधानकारक तोडगा काढून रुग्णांचे हाल थांबवले पाहिजेत. जेजे हॉस्पिटलसारख्या संस्थेत शिस्त पाळली गेली पाहिजे. हे सुनिश्चित करण्याची वेळ आली आहे.
ते पुढे म्हणाले, डॉ. तात्याराव लहाने सेवानिवृत्तीनंतरही सेवा देत आहेत. त्यांच्यासारख्या अधिकाधिक तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आरोग्यसेवेला नेहमीच असणार आहे. त्यामुळे डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्यासह सर्वच वरिष्ठ डॉक्टरांना त्यांचे राजीनामे मागे घेण्यास सांगावं. मार्डच्या निवासी डॉक्टरांचंही समाधान होईल असा सर्वमान्य, रुग्णांच्या, राज्याच्या हिताचा तोडगा काढण्यात यावा, असे देखील अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.