नवी दिल्ली – पोषणविषयक जनजागृती आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध पौष्टिक अन्न, फळे आणि भाजीपाला या सर्वांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी समर्पित आहाराक्रांती या अभियानाचा प्रारंभ केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केला.
विज्ञान भारती, ‘ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स फोरम’, विज्ञान प्रसार, आणि अनिवासी भारतीय शैक्षणिक व वैज्ञानिक संपर्क यांनी संयुक्तरित्या ‘आहार क्रांती’ अभियान सुरू केले आहे. ‘उत्तम आहार-उत्तम विचार’ हे याचे बोधवाक्य आहे.
भारत आणि जगात इतरत्र भेडसावणारी उपासमारीची समस्या आणि त्या सोबत येणाऱ्या आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणून ‘आहारक्रांती’ चळवळ सुरू करण्यात आली आहे. एका अभ्यासानुसार भारतात जितक्या कॅलरीजचे ग्रहण केले जाते त्यापेक्षा जवळजवळ दुप्पट उत्पादन होते. तरीही, देशातील बरेच लोक अद्याप कुपोषित आहेत. या विसंगतीचे मूळ कारण पोषणाबाबत जागरुकतेचा अभाव हे आहे.
भारतातील पारंपरिक आहारसमृद्ध आणि पोषणमूल्यांनी परिपूर्ण असून त्याबाबत लोकांमध्ये प्रबोधन करून समस्येवर मात करणे, हे अभियानाचे उद्दिष्ट आहे. हे स्थानिक पातळीवरील मोसमी फळे आणि भाज्यांमधील पौष्टिक संतुलित आहाराबाबत दृष्टिकोनात नव्याने बदल हे अभियान घडवेल.
विज्ञान भारती आणि ग्लोबल इंडियन सायंटिस्ट्स अँड टेक्नोक्रॅट्स’ फोरमने या अभियानासाठी पुढाकार घेतला असून इतर अनेक संस्थादेखील आपली संसाधने आणि कौशल्य यांचे योगदान देण्यासाठी यात सहभागी झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी आभासी माध्यमातून उपक्रमाचा प्रारंभ केला.
देश आज कोविड19 सारख्या साथीच्या संकटाचा सामना करत असताना साथीचा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने संतुलित आहार हे एक महत्त्वाचे साधन आहे,’असे हर्षवर्धन यांनी सांगितले. या अभियानात परदेशी भारतीय शास्त्रज्ञ आघाडीवर असल्याचे त्यांनी कौतुक केले. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत चांगल्या आहाराचा संदेश पोहोचविणे हे आहार क्रांती विकास कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे.